अनिल भंडारी
कपास किसान ॲपद्वारे कापूस खरेदीसाठी यंदा मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी नोंदणी केली असताना अर्जांची छाननी सुरू झाली आहे. जिल्ह्यात २४ हजार २७२ शेतकऱ्यांनी १७ नोव्हेंबरपर्यंत नोंदणी केली असून यातून एकाच शेतकऱ्याने दोन ते तीन वेळा केलेल्या नोंदणींमुळे तब्बल १९६२ अर्ज नाकारण्यात आले आहेत. तसेच ५ हजार ७८० अर्जांमध्ये विविध त्रुटी आढळून आल्या असून संबंधितांना बाजार समितीकडून याबाबत दुरुस्तीची सूचना दिली आहे. (Kapus Kharedi)
अर्जांची तपासणी वेगात
कपास किसान ॲपवर नोंदणी झाल्यानंतर शेतकऱ्यांची कागदपत्रे, सातबारा, डिजिटल २०२५-२६ सातबारा आणि त्यावरील कापूस पेऱ्यांची नोंद तपासली जाते. ही प्रक्रिया बाजार समितीमार्फत पूर्ण होते. त्यानंतर सीसीआयचे प्रभारी अधिकारी तपासणी करून अधिकृत नोंदणीचा एसएमएस (SMS) पाठवतात.
आतापर्यंत ११,०२८ अर्जांची तपासणी झाली असून त्यापैकी ३,२८६ अर्ज मंजूर झाले आहेत.(Kapus Kharedi)
तालुक्यानुसार मंजूर अर्जांची संख्या
माजलगाव : १२१०
बीड : ७१६
गेवराई : ४४६
धारुर : ३३७
वडवणी : ३९५
अर्ज नाकारले कशामुळे?
हॅलिडेशनदरम्यान अनेक शेतकऱ्यांनी एकापेक्षा जास्त वेळा नोंदणी केल्याचे आढळून आले. या पुनरावृत्तीमुळे १९६२ अर्ज थेट नाकारण्यात आले.
तालुकानिहाय नाकारलेल्या अर्जांची स्थिती पुढीलप्रमाणे
बीड- ३९३
माजलगाव – १०७
धारुर – १३
अंबाजोगाई – ०
गेवराई - ११८३
पाटोदा/ शिरूर- ०
परळी – ७६
वडवणी – १९०
एकुण - १९६२
त्रुटी असलेल्या ५ हजारांवर अर्जदारांना सूचना
बाजार समितीमार्फत कागदपत्रांमध्ये अचूक पडताळणी करताना ५ हजार ७८० शेतकऱ्यांच्या अर्जांत त्रुटी आढळल्या. यामध्ये सातबाऱ्यावरील माहितीतील विसंगती, चुकीची नोंदणी, अपूर्ण कागदपत्रे अशा बाबींचा समावेश आहे. सर्व शेतकऱ्यांना त्रुटी दुरुस्तीसाठी एसएमएस (SMS) किंवा फोनद्वारे कळविण्यात आले असल्याचे समितीकडून सांगण्यात आले.
जिल्ह्यातील खरेदी केंद्रांची स्थिती
सीसीआयमार्फत कापूस खरेदीसाठी बीड जिल्ह्यात पुढीलप्रमाणे खरेदी केंद्र कार्यरत आहेत
बीड तालुका – २ केंद्रे
माजलगाव, वडवणी, धारुर, गेवराई, परळी, शिरुरकासार, अंबाजोगाई – प्रत्येकी १ केंद्र
सीसीआयच्या नियमांनुसारच खरेदी प्रक्रिया सुरू आहे.
पारदर्शकतेकडे वाटचाल
अर्जांची सखोल छाननी, पुनरावृत्ती टाळणे आणि डिजिटल सातबाऱ्याची काटेकोर पडताळणी यामुळे कापूस खरेदी प्रक्रियेला अधिक पारदर्शकता मिळणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांनी अर्ज करताना एकच नोंदणी करणे, आवश्यक कागदपत्रे पूर्ण ठेवणे आणि बाजार समितीने कळविलेल्या त्रुटी तातडीने दुरुस्त करणे आवश्यक असल्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कापूस नोंदणी डबल होऊ नये यासाठी ही काळजी घ्या
* एकच शेतकऱ्याने एकदाच नोंदणी केल्यास तपासणी सोपी होते
* त्रुटी कमी राहतात
* खरेदी प्रक्रिया पारदर्शक राहते
* एसएमएस व मंजुरी लवकर मिळते
हे ही वाचा सविस्तर :Kapus Kharedi : कापूस खरेदी ऑनलाइन प्रक्रियेमुळे शेतकरी त्रस्त वाचा सविस्तर
