Kapus Kharedi : खरीप हंगामातील अतिवृष्टीमुळे कपाशीचे नुकसान झालेल्या पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांना 'सीसीआय'च्या हमीभाव खरेदीने दिलासा दिला आहे.(Kapus Kharedi)
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने पाचोड व बालानगर येथील खरेदी केंद्रांवर आतापर्यंत ६ हजार ५ शेतकऱ्यांकडून तब्बल १ लाख २८ हजार क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे.(Kapus Kharedi)
१०,३०१ शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी
हमीभावात कापूस विक्रीसाठी तालुक्यातील १०,३०१ शेतकऱ्यांनी 'कपास किसान ॲप'वर ऑनलाइन नोंदणी केली होती. त्यापैकी ६,००५ शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यात आला आहे. मात्र, दुबार नोंदणी, अपूर्ण कागदपत्रे आणि तांत्रिक अडचणींमुळे २ हजार ४९५ शेतकरी अद्याप प्रतीक्षा यादीत आहेत.
बाजार समितीचे सभापती राजू भुमरे, सचिव नितीन विखे आणि उपसभापती राम एरंडे यांनी २७ फेब्रुवारीपर्यंत नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
खरेदी केंद्रांवर लगबग
पाचोड खरेदी केंद्र : ४०,१०५ क्विंटल खरेदी
बालानगर खरेदी केंद्र : ८८,००० क्विंटल खरेदी
दोन्ही केंद्रांवर सध्या शेतकऱ्यांची मोठी गर्दी असून कापूस विक्रीसाठी ट्रॅक्टर-ट्रॉलींच्या रांगा लागत आहेत.
खासगी दर घसरल्याने सीसीआयकडे ओढा
जानेवारी महिन्यात खासगी व्यापाऱ्यांकडील दर वाढून गेले होते. त्यामुळे काही शेतकरी खासगी बाजाराकडे वळले होते. मात्र, मागील आठवड्यात खासगी दरात घसरण झाल्याने पुन्हा शासकीय खरेदी केंद्रांकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढला आहे.
अतिवृष्टीचा फटका, हमीभावाची अपेक्षा
खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे कपाशीचे उत्पादन घटले. कमी उत्पादनामुळे किमान हमीभाव तरी चांगला मिळावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांची होती. सीसीआयच्या खरेदीमुळे सध्या हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
प्रतीक्षेत असलेल्यांची चिंता कायम
प्रतीक्षा यादीतील २,४९५ शेतकरी कागदपत्रांच्या त्रुटी दूर करून खरेदीसाठी संधी मिळण्याची वाट पाहत आहेत. प्रशासनाने प्रक्रिया गतीमान करून सर्व पात्र शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्याची गरज व्यक्त होत आहे.
पैठण तालुक्यात 'सीसीआय'च्या माध्यमातून सुरू असलेल्या कापूस खरेदीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना आधार मिळाला आहे.
अद्याप प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची खरेदी पूर्ण झाल्यास तालुक्यातील कापूस उत्पादकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
हे ही वाचा सविस्तर : Tur Market : ९ हजारांचा पल्ला गाठूनही तुरीची पडझड; भाववाढीची आशा फोल?
