Join us
Daily Top 2Weekly Top 5

कांदा चाळीत ठेवायचा की विकून लोकांचे पैसे फेडायचे, या कारणाने रिकाम्याच राहाणार कांदा चाळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 12:29 IST

Agriculture News : कांदा चाळीत ठेवायचा की, विकून लोकांचे पैसे परत करायचे, हा प्रश्न शेतकऱ्यास पडला आहे.

नाशिक : देवळा तालुक्यात झालेला अवकाळी पाऊस, तसेच सततचे ढगाळ वातावरण आणि पाणीटंचाई यामुळे उन्हाळी कांदा उत्पादन मोठ्या प्रमाणात घटल्याने बहुतांश कांदाचाळी रिकम्या राहणार असल्याचा अंदाज शेतकऱ्यांनी वर्तविला आहे.

नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक उन्हाळी कांद्याचे उत्पादन कसमादे परिसरामध्ये घेतले जाते. या परिसरात कांदा या पिकाकडे नगदी पीक म्हणून पाहिले जाते. दरवर्षी सर्वसाधारणशेतकरी निदान दोनशे ते तीनशे क्विंटल कांदा चाळीत साठवणूक करतात. जेव्हा कांद्याला चांगला भाव मिळेल तेव्हा कांद्याची विक्री केली जाते. 

परंतु, चालू वर्षी उन्हाळी कांद्याच्या बियाण्यांची कमतरता भासली. शिवाय अवकाळी पाऊस आला आणि रोपे खराब झाली. शेतकऱ्यांनी पुन्हा दुकानदारांकडून महागडी बियाणे टाकली. मात्र बऱ्याच प्रमाणात ढोगळे निघाले. यंदा कांदा पिकाला अनेक संकटातून जावे लागले. चालू वर्षी सुरुवातीपासून पावसाचे प्रमाण कमी असल्याने कांदा पीक येणार नाही, असे वाटत असतानाही शेतकऱ्यांनी मोठ्या हिमतीने कांदा लागवड केली होती. 

कांद्याचे पीक ऐन मोसमात असताना आलेल्या अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणामुळे गिरणा परिसरातील कांदा ख़राब झाला. काही कांद्यावर करपा रोग पडल्यामुळे उन्हाळी कांद्याच्या उत्पादनात घट झाली. काही ठिकाणी तुरळक पाऊस झाल्याने व कडक उन्हामुळे कांदा पिकाला ऐन गळतीच्या वेळी पाण्याची टंचाई निर्माण झाली.

आता काही शेतकरी उन्हाळी कांदा काढणीला सुरुवात केली आहे. परंतु, दरवर्षी ज्या प्रमाणात कांद्याच्या पिकाचे भरघोस उत्पादन निघत होते ते या वर्षी निघाले नाही. ज्या तुकड्यात चार ट्रॅक्टर ट्रॉली कांदा निघत असे तेथे दोन ट्रॉली कांदा निघत असल्याने उत्पादनात मोठी घट झाली आहे. मागच्या वर्षी शेतकऱ्यांनी दुसरीकडून कांदा विकत घेऊन चाळीत ठेवला होता. त्यांच्यात त्याला नफाऐवजी तोटा झाला होता.

मागील अनुभवाचा वापर शेतकरी करणार ?पूर्वी कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन निघत असे. त्यामुळे शेतकरी अर्धा कांदा विकून दुसऱ्याकडून उसनवार आणलेले पैसे, लग्न, खत, खाद्य, दुकानदारांची उधारी देत असे आणि अर्धा कांदा चाळीत साठवून ठेवत असे. जो काही थोडाफार कांदा निघातो तो चाळीत ठेवायचा की, विकून लोकांचे पैसे परत करायचे, हा प्रश्न शेतकऱ्यास पडला आहे.

लोकांचे देणे, मुला-मुलींचे लग्न असल्याने कांद्याची लगेचच विक्री केल्याशिवाय पर्याय नसतो. मागील अनुभव लक्षात घेता यावर्षी कांदा विकत घेऊन साठवणूक करण्याचे धाडस शेतकरी करणार नाहीत. त्यामुळे यंदा कांदाचाळी रिकाम्याच राहणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Onion Storage Dilemma: Sell or Store? Empty Onion Storage Structures Loom.

Web Summary : Unseasonal rains and water scarcity in Deola, Nashik, have severely impacted onion production. Farmers anticipate mostly empty storage structures as yields plummet. Many face tough choices: sell now to repay debts or risk storing with uncertain profits, learning from past losses.
टॅग्स :कांदामार्केट यार्डनाशिकशेती क्षेत्र