नितीन कांबळे
खरीप हंगामात झालेल्या अतिपावसाचा थेट परिणाम रब्बी हंगामावर झाला असून, आष्टी तालुक्यात यंदा ज्वारीच्या क्षेत्रात सुमारे साडेतीन हजार हेक्टरची घट नोंदवली गेली आहे.(Jowar Cultivation)
ज्वारीची काढणी सुरू झाली असली तरी पूर्वीसारखे शेतात घुमणारे 'भलरी'चे पारंपरिक सूर आता ऐकू येत नाहीत. त्यामुळे ग्रामीण संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेली भलरी हळूहळू काळाच्या पडद्याआड जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.(Jowar Cultivation)
पूर्वी ज्वारीच्या काढणीच्या वेळी शेतात मजुरांच्या इरजिकीसोबत गायली जाणारी 'व्हय गड्या दादा रे… भल गडी दादा…' ही भलरी आता क्वचितच कानावर पडते.
यंदा ज्वारीचा पेरा घटल्याने आणि मजुरांची तीव्र टंचाई जाणवत असल्याने बहुतांश शेतकरी घरच्या घरीच काढणी करत आहेत. परिणामी सामूहिक काढणी आणि त्यासोबत भलरी गाण्याची परंपरा लोप पावत चालली आहे.
पाण्यामुळे पीकपद्धतीत बदल
काही वर्षांपूर्वी दुष्काळी परिस्थितीमुळे आष्टी तालुक्यात ज्वारीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर होते. मात्र मागील तीन-चार वर्षांपासून समाधानकारक पावसामुळे पाण्याची उपलब्धता वाढली.
याचा फायदा घेत शेतकऱ्यांनी गहू, कांदा आणि तूर या पिकांकडे मोर्चा वळवला. या पिकांना तुलनेने चांगला बाजारभाव आणि यांत्रिकीकरणाची सोय उपलब्ध असल्याने ज्वारीकडे शेतकऱ्यांचा कल कमी झाला आहे.
आकडे काय सांगतात?
मागील वर्षीचा ज्वारी पेरा : २७,५६८ हेक्टर
यंदाच्या वर्षीचा ज्वारी पेरा : २४,१४६ हेक्टर
घटलेले क्षेत्र : ३,४२२ हेक्टर
शेतकरी काय सांगतात?
ज्वारीचा पेरा दिवसेंदिवस कमी होत आहे. काढणीसाठी गावात मजूर मिळत नसल्याने घरच्या घरीच काढणी करावी लागणार आहे. लागवडीपेक्षा काढणीचा खर्च अधिक होतो. - अन्सार शेख, शेतकरी
दरवर्षीच्या तुलनेत यंदा ज्वारीचा पेरा कमी असून कांद्याची लागवड वाढली आहे. ज्वारी पिकाला मेहनतीच्या मानाने मोबदला परवडत नाही, त्यामुळे हे क्षेत्र पुढेही घटत राहील.- संतोष ओव्हाळ , शेतकरी
मागील काही वर्षांपासून पावसाचे प्रमाण चांगले असल्याने कांदा, तूर आणि गहू या पिकांचे क्षेत्र वाढले आहे. यंदा पावसाने वेळेवर उघडीप न दिल्याने ज्वारीच्या पेरणीवर परिणाम झाला आणि साडेतीन हजार हेक्टर क्षेत्र घटले. - गोरख तरटे, तालुका कृषी अधिकारी
एकीकडे पीकपद्धतीत बदल होत असताना दुसरीकडे ज्वारीसोबत जोडलेली लोकसंस्कृतीही हळूहळू लोप पावत आहे. भलरीचे सूर मुके होत चालले असून, ही केवळ पिकाची नव्हे तर ग्रामीण परंपरेचीही हानी असल्याची भावना जाणकार व्यक्त करत आहेत.
