Agriculture News : वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या मालमत्तेत मुलीला वाटा मिळतो का, आणि वाटा मिळावा यासाठी दावा करण्यास काही ठरावीक कालावधीची मर्यादा असते का, असे प्रश्न अनेकदा विचारले जातात.
हिंदू वारसा कायद्यानुसार, वडिलांनी मृत्युपत्र केले असेल किंवा नसेल, तरीही मुलीला आपल्या हक्काचा वाटा मागण्याचा पूर्ण अधिकार आहे. असा दावा करण्यासाठी कायद्याने कोणतीही मुदत दिलेली नाही, मात्र कायद्यातील काही तरतुदीही समजून घेणे आवश्यक आहे.
मृत्युपत्र नसेल तर काय?
जर वडिलांनी आपल्या मालमत्तेबाबत कोणतेही मृत्युपत्र केले नसेल (इनटेस्टेट), तर हिंदू वारसा कायदा १९५६ च्या तरतुदीनुसार त्यांच्या मालमत्तेचे वाटप सर्व कायदेशीर वारसांमध्ये केले जाते. वडिलांच्या निधनानंतर लगेचच वारसांना हा हक्क प्राप्त होतो. अशा वेळी मुलगी न्यायालयात धाव घेऊन आपला हिस्सा मागू शकते. २००५ च्या दुरुस्तीनंतर मुलीचा हक्क अधिक मजबूत झाला आहे.
१२ वर्षांचा 'तो' नियम काय सांगतो?
मालमत्तेचा ताबा मिळवण्यासाठी १२ वर्षांचा कालावधी सांगितला आहे. अनेकदा लोकांना वाटते की ही १२ वर्षे वडिलांच्या निधनानंतर सुरू होतात, पण तसे नाही. कायद्यानुसार १२ वर्षांची गणना खालील प्रसंगांपासून सुरू होते. इतर वारस मुलीचा हक्क नाकारतात. जेव्हा मुलीला मालमत्तेतून बेदखल केले जाते. जेव्हा मुलीच्या संमतीशिवाय मालमत्तेची विक्री, हस्तांतरण केले जाते.
मालमत्तेवर दावा करण्यापूर्वी...
तज्ज्ञांच्या मते, मुलीने सर्वप्रथम लेखी नोटीसद्वारे आपल्या हिश्श्याची मागणी करावी. जर इतर वारसांनी हा हक्क मान्य करण्यास नकार दिला, तरच कायदेशीर वादाचे (क्वाज ऑफ अॅक्शन) कारण निर्माण होते आणि त्यानंतर ती न्यायालयात दावा दाखल करू शकते. तरीही, वैयक्तिक प्रकरणांमध्ये गुंतागुंत असू शकते, त्यामुळे तज्ज्ञ वकिलांचा सल्ला घेणे केव्हाही हिताचे ठरते.
वडिलांच्या मालमत्तेत मुलीला समान हक्क असतो, मग मृत्युपत्र असो वा नसो. हिंदू वारसा कायदा १९५६ नुसार वडिलांच्या निधनानंतर सर्व कायदेशीर वारसांमध्ये मालमत्तेचे वाटप होते आणि मुलगी आपला हिस्सा मागू शकते. दावा करण्यापूर्वी नोटीस देणे महत्त्वाचे मानले जाते.
हेही वाचा : एखादा पुरुष, महिला जर मृत्युपत्र न करता मरण पावले तर मिळकत कुणाला मिळते? वाचा सविस्तर
