HTBT Cotton Seed : कपाशी पेरणीचा हंगाम अवघ्या काही दिवसांवर आला असताना, बाजारात प्रतिबंधित बीटी कपाशी बियाण्यांच्या अवैध विक्रीचा धोका वाढला आहे. यामुळे कृषी विभाग सतर्क झाला आहे. (HTBT Cotton Seed)
गुजरातमार्गे होणाऱ्या बोगस बियाण्यांच्या प्रवेशावर वॉच ठेवण्यात येत आहे. कृषी विभागाच्या पथकांनी सीमावर्ती तालुक्यांमध्ये मोर्चा वळवला असून, फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध आता थेट गुन्हे दाखल होणार आहेत. (HTBT Cotton Seed)
बुलढाणा जिल्ह्यात कपाशी पेरणीचा हंगाम सुरु होताच, शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान आणि उत्पादनातील घट टाळण्यासाठी कृषी विभागाने अवैध बीटी कापूस बियाण्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. विशेषतः गुजरातहून प्रतिबंधित बियाण्यांची चोरटी आयात होण्याची शक्यता लक्षात घेता, जिल्ह्याच्या सीमावर्ती भागांवर कडक लक्ष ठेवले जात आहे.(HTBT Cotton Seed)
बियाण्यांची तपासणी आणि कारवाई
आतापर्यंत जिल्ह्यातील दोन संशयित बियाण्यांचे नमुने तपासणीसाठी घेतले असून, सुदैवाने त्यामध्ये कोणतीही अनुचित बाब आढळली नाही. मात्र, कृषी विभाग सजग असून, प्रतिबंधित बीटी बियाणे सापडल्यास थेट फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार असल्याचा इशारा दिला गेला आहे.
सीमावर्ती तालुक्यांमध्ये विशेष लक्ष
मलकापूर, जळगाव जामोद, नांदुरा आणि संग्रामपूर या सीमावर्ती तालुक्यांमध्ये कृषी विभाग विशेष गस्त ठेवत आहे. याशिवाय, बाजारपेठ, कृषी दुकाने, मुख्य रस्ते व माल वाहतूक रस्त्यांवर निरीक्षण सुरू असून, १४ स्वतंत्र पथके कार्यरत आहेत.
बियाण्यांची गरज आणि नियोजन
या वर्षी बुलढाणा जिल्ह्यात १ लाख ८७ हजार ९९१ हेक्टर क्षेत्रावर कपाशी पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी अंदाजे ४ हजार ७०० क्विंटल म्हणजेच ९.३९ लाख बियाण्याची पाकिटे लागणार आहेत. कृषी विभागाने बियाण्यांचा पुरेसा साठा व पुरवठा नियोजनबद्ध केला आहे.
नियंत्रणासाठी बियाणे, खते, कीटकनाशकांचे नमुने
यंदा कृषी विभागाला १ हजार ४०० बियाणे, ८३० खते आणि २१५ कीटकनाशकांचे नमुने तपासण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. गतवर्षी १ हजार ३१२ बियाणे, ६१९ खते, व २ हजार १६२ कीटकनाशक नमुने तपासण्यात आले होते.
३५० परवाने रद्द, १८ प्रकरणे न्यायालयात
खराब दर्जाचे खते, बियाणे व कीटकनाशके विकणाऱ्या विक्रेत्यांवर गतवर्षी ३५० परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले होते. यावर्षीही अशीच कडक कारवाई होणार आहे. १८ प्रकरणे थेट न्यायालयात तर १७ प्रकरणांमध्ये ताकीद, १२ परवाने निलंबित करण्यात आले होते.
कृषी विभागाचे आवाहन
शेतकऱ्यांनी केवळ अधिकृत परवाना असलेल्या विक्रेत्यांकडूनच बियाणे खरेदी करावे. संशयास्पद बाब आढळल्यास कृषी विभागाशी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक गणेश सावंत यांनी केले आहे.