HTBT Cotton Seed : मजुरांची टंचाई, तणांचे संकट आणि त्यातच बंदी असलेल्या बियाण्यांवरून पोलिसांची थेट कारवाई. सावनेर तालुक्यातील बिडगाव येथील शेतकरी रमेश घाटोडे यांच्या घरी स्थानिक गुन्हे शाखेने धाड टाकून ५६ हजार रुपये किमतीच्या ४० एचटीबीटी कापसाच्या बियाण्यांची पाकिटे जप्त केली.
या कारवाईनंतर शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे, तर बियाणे उत्पादक कंपन्यांवर कारवाई का होत नाही, हा सवाल पुन्हा ऐरणीवर आला आहे. (HTBT Cotton Seed)
स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने केळवद (ता. सावनेर) पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बिडगाव येथील एका शेतकऱ्याच्या घरी धाड टाकली. (HTBT Cotton Seed)
यात त्यांनी ५६ हजार रुपये किमतीचे कापसाचे प्रतिबंधित एचटीबीटी बियाण्यांची ४० पाकिटे जप्त केली. शिवाय, शेतकऱ्यास अटक करून त्याची पोलिस कोठडीही मिळविली. ही कारवाई सोमवारी (दि. ९) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. (HTBT Cotton Seed)
रमेश नत्थू घाटोडे, रा. बिडगाव, ता. सावनेर असे अटक करण्यात आलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. रमेश यांच्याकडे शेती असून, त्यांनी पेरणी करण्यासाठी तणनाशक सहनशील एचटीबीटी कापसाचे बियाणे खरेदी करून पाकिटे घरी ठेवली होती.
याची माहिती कुणीतरी एलसीबीतील पोलिस अधिकाऱ्यांना दिली. त्यांनी सोमवारी दुपारी बिडगाव गाठून रमेश यांना बाहेर बोलावले आणि त्यांच्या घराची झडती घेतली.
घरात बियाण्यांची ४० पाकिटे आढळून येताच पोलिसांनी तालुका कृषी अधिकारी साठे व कृषी पर्यवेक्षक मानकर यांच्याकडून त्या बियाण्यांची तपासणी केली. दोन्ही अधिकाऱ्यांनी ते प्रतिबंधित एचटीबीटी कापूस बियाणे असल्याचे सांगताच पोलिसांनी रमेश घाटोडे यांना अटक केली आणि त्यांच्याकडून बियाण्यांचे ४० पाकिटे जप्त केली. त्या बियाण्यांची एकूण किंमत ५६ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. (HTBT Cotton Seed)
त्यांना तातडीने कळमेश्वर येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना गुरुवार (१२ जून) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी केळवद पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून, तपास पोलिस उपनिरीक्षक अरुण राठोड करीत आहेत. ही कारवाई एलसीबीचे पोलिस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक चंद्रशेखर घडेकर, हवालदार रवींद्र चटप, राजू रेवतकर, देवा देवकते यांच्या पथकाने केली.
बियाणे उत्पादक कंपन्या मोकळ्या का?
कापसाच्या या बियाण्यांमध्ये तणनाशक जनुके टाकण्याचे काम बियाणे उत्पादक कंपन्या करतात. एचटीबीटी बियाणे तणनाशक सहनशील असल्याने तसेच निंदण करायला मजूर मिळत नसल्याने पिकातील तणाचे व्यवस्थापन करण्यासाठी शेतकरी या बियाण्याचा वापर करतात.
ही बियाणे शेतकरी स्वतः तयार करीत नाही. तरीही शेतकरी व विक्रेत्यांवर कारवाई केली जाते. या बियाण्यांचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांवर राज्य सरकार, कृषी व पोलिस विभाग का कारवाई करीत नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
सरकारने निंदणाला मजूर द्यावे
अलीकडे शेतीची कामे करण्यासाठी मजूर मिळेनासे झाले आहेत. निंदण केले नाही तर तणामुळे पिकांचे ४० ते ६० टक्के नुकसान होते. राज्य सरकार पर्यावरण संरक्षणाचा हवाला देत एचटीबीटी बियाण्यांवर जर बंदी घालते तर सरकारने पिकांच्या निंदणासाठी रोजगार हमी योजनेंतर्गत वेळीच पुरेसे मजूर उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली असून, रोहयोच्या दराने आपण मजुरी देण्यास तयार आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.