- चैतन्य जोशी
वर्धा : अलीकडे सौर ऊर्जेचा (Solar Energy) उपयोग अनेक क्षेत्रात होऊ लागला आहे. सौर ऊर्जेच्या वापराने विजेची मोठी बचत होत असल्याचे दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर वर्धा जिल्ह्यातील (Wardha District) हिंगणघाट तालुक्यातील चिचघाट (राठी) हे सोलर व्हिलेज म्हणून नावारूपास आले आहे. या गावात विजेपासून जेवणापर्यंत सर्व कामे आता सौरऊर्जेचा (Solar Village) वापर होत असून विदर्भातील पहिले संपूर्णपणे सौरऊर्जेचा वापर करणारे गाव ठरले आहे.
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत (Pm Suryaghar Yojana) योजनेच्या अनुषंगाने केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत योजनेच्या अनुषंगाने कार्यकारी अभियंता हेमंत पावडे यांच्या मार्गदर्शनात ‘मॉडेल सोलर व्हिलेज’ या अंतर्गत विद्युत विभागाकडून हा उपक्रम राबविण्यात आला. अवघ्या तीन महिन्यांतच हा प्राेजेक्ट पूर्ण करून चिचघाट गाव विदर्भातील पहिले सौरग्राम ठरले आहे.
हिंगणघाट तालुक्यातील चिचघाट (राठी) गाव अवघ्या १८७ लोकसंख्या असलेले तसेच ७० घरे असलेले गाव आहे. हे गाव शहरालगत असलेल्या औद्योगिक वसाहतीजवळ वसले आहे. विविध अडचणींचा सामना करत विद्युत विभागाने यासाठी बँक ऑफ बडोदा यांच्या संयुक्त वतीने कार्यशाळा घेत गावकऱ्यांचे प्रबोधन करत या प्रकल्पाच्या दिशेने वाटचालीला सुरुवात केली होती. या प्रकल्पाला शंभर टक्के शासकीय बँकेचे अर्थसाहाय्य देखील लाभले. मात्र, बँक फायनान्स दरम्यान अनेक अडचणींमुळे हा प्रकल्प मार्गी लागणार की नाही, याबाबत साशंकता निर्माण होऊ लागली होती.
दरम्यान विद्युत विभागातील अधिकारी आणि कार्यकारी अभियंता पावडे यांनी येणाऱ्या सर्व अडचणींवर मात करत प्रकल्पाला गती देण्याचे काम करत विविध त्रुटी दूर सारत लाभार्थ्यांना योजनेचा लाभ कसा मिळवून देता येईल, याबाबत शर्थीचे प्रयत्न करून प्रकल्पाला चालना दिली. परिणामी, चिचघाट हे गाव शंभर टक्के सौरग्राम ठरले आहे. विशेष म्हणजे यासाठी बँक ऑफ बडोदा ही महत्त्वाचा दुवा ठरली. शासनाच्या जन समर्थ या पोर्टलद्वारे सौर प्रकल्पासाठी आवश्यक असलेले अर्थसाहाय्य बँकेने मिळवून दिले.
२८ टीन अन् कौलारू घरे असलेल्यांनाही लाभचिचघाट (राठी) गावात आवश्यकतेनुसार ७० रहिवासी असलेल्या घरांना सौरऊर्जा पॅनलची जोडणी करण्यात आली आहे. यामध्येसुद्धा अपवादात्मक परिस्थितीवर मात करत २८ टिनांच्या आणि काैलारू घरे असलेल्या रहिवासी नागरिकांनादेखील या योजनेचा लाभ देण्यात आला असून त्यांचेही नियोजन करण्यात आले आहे.
तीन महिन्यांच्या कालावधीत दिले मूर्तरूपसौरऊर्जा प्रकल्पाला गती देण्यासाठी विद्युत विभागातील अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी अहोरात्र मेहनत घेतली. अवघ्या तीन महिन्यांत हा प्रकल्प पूर्ण करुन विदर्भात सौरऊर्जेला चालना देण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. हिंगणघाट उपविभागातील विद्युत अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा पाया रचून या प्रकल्पाला मूर्तरूप दिले आहे. त्यामुळे हिंगणघाट तालुक्यातील चिचघाट (राठी) गाव आता सौर ऊर्जेच्या प्रकाशात झळकणार आहे.