भंडारा : शेतकऱ्यांच्या वार्षिक उत्पादनात वाढ होण्याकरिता विविध अंगाने शेतीत उत्पादनाची नितांत गरज आहे. धान, कडधान्य, भाजीपाला उत्पादनाबरोबरच फळबागेचे नियोजन शेतकऱ्यांना फलदायी ठरत आहे. आंबा व पेरू बागेची लागवड अधिक आहे.
बागेची विशेष काळजी घेण्याकरिता आंबा फळबागांचे तंत्रशुद्ध व्यवस्थापन साधण्याचे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी किशोर पात्रीकर यांनी केले आहे. साकोली उपविभागीय कृषी अधिकारी किशोर पात्रीकर यांनी पालांदूर येथील फळबागात शिवारफेरी अंतर्गत उपस्थिती दर्शविली.
घन लागवड पद्धत शेतकऱ्यांसाठी फायद्याची
घन लागवड पद्धतीमुळे बागेची योग्य पद्धतीने निगा राखण्याकरिता मोठी मदत होत आहे. बाग स्वच्छ व सुरक्षित ठेवण्याकरिता घन लागवड पद्धत वापरली जात आहे. यामुळे फळबाग स्वच्छ राहून रोगराईचे प्रमाण कमी होण्यास मोलाची मदत मिळते.
फळबाग लागवडीची पद्धत
पाच बाय पाच मीटर अंतरावर आंबा फळबागांचे घन पद्धतीने लागवड करावी. झाडांना मर्यादित आकार देण्याकरिता छाटणीकडे लक्ष द्यावे. नवीन लागवड केलेल्या कलमांची वाढ अडीच फुटांपर्यंत फांद्या फुटू देऊ नयेत. मुख्य खोडाची दोन फूट उंचीवर छाटणी करावी. त्यानंतर आलेल्या फांद्यामधून मजबूत व समांतर अशा तीन फांद्या ठेवाव्यात.
कीडमुक्त बाग गरजेची
नियमितपणे बागेत लक्ष देणे गरजेचे आहे. ऊन, वारा, पाऊस यांचा नकारात्मक परिणाम बागेवर शक्य आहे. त्यामुळे वेळोवेळी लक्ष देऊन शिफारसीनुसार फवारणी करावी. बुरशीनाशकामध्ये कापर ऑक्झिक्लोराईड ५० टक्के प्रवाही २५ ग्रॅम किंवा आणखी इतर बुरशीनाशक शिफारसीनुसार फवारावे. जवळच्या कृषी सहायकांशी संपर्क साधावा.
