मुंबई : जानेवारी सुरू झाला की वेध लागतात ते मकरसंक्रांतीच्या सणाचे. वेगवेगळ्या नावांनी हा सण साजरा केला जातो. महाराष्ट्रात या सणाच्या दिवशी सर्वाधिक महत्त्व तिळगूळ लाडूला असते. तीळ व गुळापासून बनविले हे लाडू आरोग्यासाठी गुणकारी मानले जातात.
तूप, तीळ, गूळ, खोबऱ्यापासून तयार केलेले हे लाडू हिवाळ्यात शरीरातील उष्णता टिकून ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतात. एनर्जी देण्यासह तिळाच्या लाडूचे अनेक फायदे आहेत. तिळामध्ये हेल्दी फॅट्स, प्रोटिन, बी व्हिटॅमिन्स, मिनरल्स, फायबर, अँटीऑक्सिडंट्स आणि शरीराला आवश्यक घटक असतात.
त्याशिवाय यात अनसॅच्युरेटेड फॅट्सदेखील असतात. तिळाच्या लाडूचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते, ज्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो असे अनेक अभ्यासातून सांगण्यात आले आहे. यामुळे हे लाडू बाजारात ३५० ते ४०० रुपये किलोने मिळतात.
फायबरचे उत्तम स्रोत
तिळगुळाचे लाडू हे फायबरचा उत्तम स्रोत मानला जातो. फायबर हे हृदयरोगासंबंधित समस्या आणि लठ्ठपणा दूर करण्यासाठी अधिक उपयुक्त ठरते. फायबर शरीराला योग्य प्रमाणात मिळाले तर शौचाला कडक होणे वा बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून सुटका मिळण्यास मदत मिळते. त्यामुळे थंडीच्या दिवसांत पाणी कमी पीत असाल तर तिळाचे लाडू नक्की खावेत.
रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत
विशेषतः हिवाळ्यात जेव्हा अनेक लोकांना सर्दी-खोकल्याचा त्रास असतो; अशा वेळी तिळगूळ खाणे फायदेशीर ठरते का? हिवाळ्यात शरीराला रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उष्णपदार्थांची आवश्यकता असते. तज्ज्ञ सांगतात, तीळ आणि गूळ हे दोन्ही पदार्थ पचनक्रिया आणि रोगप्रतिकारशक्ती सुरळीत ठेवण्यासाठी मदत करतात.
तिळगुळामध्ये तूप टाकून खाल्ले, तर शरीराला ओमेगा ३, ६ व २ मिळतात. पांढऱ्या तिळामध्ये फायटोस्टेरॉल्स असतात; जे कोलेस्ट्रॉल तयार होणे थांबवतात. काळ्या तिळामध्ये अधिक प्रमाणात फायटोस्टेरॉल्स असतात; जे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास अधिक फायदेशीर आहेत.
हिवाळ्यात तिळगूळ का खावा?
तिळामध्ये फायबरसह भरपूर प्रमाणात जीवनसत्त्व ई, बी ६, लोह व तांबे असते. हिवाळ्यात तिळाचे सेवन केल्याने शरीराला ऊब मिळते. त्यातील प्रोटिनमुळे चयापचय क्रिया सुधारते आणि भूक कमी लागते. हिवाळ्यात तिळगुळाचे जे लाडू आपण आवर्जून खातो; तेव्हा ई जीवनसत्त्व रक्तवाहिन्यांत कोणताही अडथळा निर्माण होऊ देत नाही.
