चामोर्शी : उन्हाळा म्हटला की, आंब्याचा मोह टाळणे कठीण. अक्षयतृतीयापासून सुरू होणाऱ्या आमरसाच्या आस्वादाची सर्वानाच प्रतीक्षा असते. मात्र, यंदा गावरान आंब्याची चव चाखणे महाग पडण्याची चिन्हे दिसत आहेत.
मार्च-एप्रिल महिन्यांतील अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्यामुळे झाडांवरील आंबे मोठ्या प्रमाणात गळून पडले आहे. परिणामी उत्पादन घटण्याची शक्यता असून, बाजारात दर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सध्या बाजारात विविध संकरित जातींचे आंबे उपलब्ध होऊ लागले असले तरी गावरान आंब्याची चव वेगळीच असल्याने ग्राहकांचा त्याकडे अधिक कल असतो. त्यामुळे गावरान आंब्याला नेहमीच चांगली मागणी असते. मात्र, गेल्या काही वर्षात आंब्याची झाडे कमी होत चालल्याचे चित्र आहे. पूर्वी सरपणासाठी मोठ्या प्रमाणात असलेली झाडे आता दुर्मिळ झाली आहेत.
त्यातच बदलत्या हवामानाचा परिणाम उत्पादनावर होत असल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. तालुक्याच्या ग्रामीण भागात लंगडा, दशहरी यांसारख्या जाती आढळून येतात. मात्र, आंबे लवकर पिकवण्यासाठी रसायनांचा वापर वाढल्याने चवीत फरक जाणवत असतो.
गावरान आंब्यासाठी करावी लागणार प्रतीक्षा
सध्या झाडांवर गावरान आंब्याचा बहर दिसून येत असला तरी प्रत्यक्ष पिकून बाजारात येण्यासाठी जवळपास सव्वा महिना प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे यंदा गावरान आंब्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर ग्राहकांना जास्त पैसे मोजण्याची तयारी ठेवावी लागणार आहे. तसेच भविष्यातील गरज लक्षात घेता वृक्षलागवडीत आम्रवृक्षांना प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे.
आमराईत घटली संख्या
चामोर्शी, आरमोरी, गडचिरोली या तीन तालुक्याच्या ग्रामीण भागात अनेक गावात मोठ्या आमराई आहेत. मात्र, काळानुरूप या आमराईत आंब्यांच्या झाडांची संख्या कमी झाली आहे. यावर्ष उत्पादन घटणार आहे.
माझ्या शेतात आंब्यांची ४० ते ४५ झाडे आहेत. यावर्षी शेतातील संकरीत आंब्यांना चांगला बहर येऊन आंबे लागले होते. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी वादळी पावसाने आंबे गळून पडले.
- पुनाजी घोडे, शेतकरी, नागपूर चक
