नाशिक : येवला तालुक्यातील नगरसुल परिसरात चालू वर्षी गव्हाचे क्षेत्र विशेषतः उत्तर पूर्व भागात मोठ्या प्रमाणात असल्याने सुरुवातीला हार्वेस्टर मालकांकडून गव्हाची कापणी एकरी १८०० रुपयांप्रमाणे केली जात होती. पूर्वी एकरी १८०० रुपये असलेला कापणीचा दर आता थेट २८०० रुपयांपर्यंत आकारला जात असून, ही वाढ शेतकऱ्यांसाठी आर्थिक बोजा ठरत आहे.
सध्या हार्वेस्टर मशीनसाठी शेतकऱ्यांची अक्षरशः झुंबड उडालेली दिसत आहे. आपले पीक आधी कापून घ्यावे, यासाठी शेतकरी हार्वेस्टरचा वापर करीत आहेत. वाढत्या मागणीचा फायदा घेत काही हार्वेस्टर चालकांनी गव्हाच्या कापणीचे दर अचानक वाढवल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे.
अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला जाईल, या भीतीने कोणताही पर्याय नसल्याने शेतकरी वाढीव दर मोजण्यास तयार होत आहे. वर्षभराच्या कष्टाने उभे केलेले पीक निसर्गाच्या तडाख्यात सापडू नये, हीच त्यांची धडपड सध्या दिसून येत आहे.
जादा पैशांची आकारणी
वापरले जाणारे अनेक हार्वेस्टर पंजाबमधून आणले आहेत, तर काही महाराष्ट्रातीलच व्यावसायिकांनी खरेदी केले आहेत. मात्र, मागणी वाढताच दर वाढवले जात असल्याने शेतकऱ्यांत नाराजी आहे. कांद्याला कवडीमोल दर मिळत असून, भाजीपाल्याची स्थितीही समाधानकारक नाही. अशा संकटात शेतकऱ्यांना गव्हाच्या कापणीसाठीही जादा पैसे मोजावे लागत आहे.
हार्वेस्टरचे दर नियंत्रणात आणावे
महागाई, इंधनदरवाढ, गॅस टंचाई आणि शेतमालाला न मिळणारा योग्य भाव यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी प्रचंड तणावाखाली आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या अडचणी तातडीने लक्षात घेऊन हार्वेस्टर दर नियंत्रणात आणावेत, अवकाळीमुळे होणाऱ्या संभाव्य नुकसानीपासून दिलासा देणारी उपाययोजना करणे गरजेचे आहे.
चार दिवसांपूर्वी हार्वेस्टरने गहू काढण्यासाठी एकरी मजुरी अठराशे रुपये घेत होते. जनावरीसाठी लागणाच्या कुटीचा हार्वेस्टरचा दर अडीच हजार ते तीन हजारपर्यंत होता. आता तो अव्वाच्या सव्वा आकारला जात आहे.
- सजन कुडके, शेतकरी, नगरसूल.
जमिनीचे तोंडी वाटप कायदेशीर असते का, नवीन वारस हिस्सा मागू शकतात का? वाचा सविस्तर
