Join us

E KYc : शेतकऱ्यांनो! अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे नुकसान झालंय, ई-केवायसी करण्याचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2024 17:23 IST

Nashik : अवकाळीमुळे (Unseasonal Rain) बाधित झालेल्या ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

नाशिक जिल्ह्यात (Nashik District) सप्टेंबर-ऑक्टोबर 2022 ते जानेवारी 2024 या कालावधीत झालेल्या  अवकाळी पावसामुळे  व खरीप 2023 या कालावधीत दुष्काळी  परिस्थितीमुळे शेतीपिके व फळपिकांच्या झालेल्या नुकसानीबाबत शासनाच्या ई-पंचनामा या ऑनलाइन पोर्टलवर बाधित शेतकरी यांची नावे, बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक व इतर माहिती अपलोड करण्यात येत आहे. या अनुषंगाने वरील कालावधीत बाधित झालेल्या ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेले नाही, त्यांनी नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्रात ई-केवायसी (E KYC) करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.

प्रशासनामार्फत जिल्ह्यात सप्टेंबर-ऑक्टोबर 2022 ते जानेवारी 2024 या कालावधीत तसेच खरीप 2023 कालावधीत झालेल्या शेतीपिके व फळपिकांच्या झालेल्या नुकसानीबाबत शासनाच्या ई-पंचनामा या ऑनलाइन पोर्टलवर अपलोड केलेल्या बाधित शेतकऱ्यांच्या याद्या सर्व तहसिल कार्यालयामार्फत सर्व तलाठी कार्यालये व बाधित ग्रामपंचयात (Grampanchayat) कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. ज्या बाधित शेतकऱ्यांनी ई-केवायसी तसेच बँक खाते आधार कार्डसोबत संलग्न केले आहे, त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर शासनामार्फत नुकसानीची रक्कम जमा करण्यात आली आहे.

पोर्टलवर अपलोड केलेल्या यादीतील ज्या बाधित शेतकऱ्यांनी अद्याप प्रमाणीकरण (E-KYC) केलेले नाही त्यांनी नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्रावर ई-केवायसी करून घ्यावे. त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांचा आधार क्रमांक  बँक खाते क्रमांकाशी संलग्न नाही त्यांनी आधार क्रमांक तत्काळ अद्ययावत करून घेवून बँक खाते देखील आधार क्रमांकाशी संलग्न करून घ्यावेत. जेणे करून बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये शेतीपीक नुकसानीची रक्कम जमा करणे शक्य होईल, असेही जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी कळविले आहे.

टॅग्स :शेतीनाशिकपाऊसगारपीटशेती क्षेत्र