रूपेश उत्तरवार
राज्य सरकारने कृषी योजनांतील लाभासाठी 'फार्मर आयडी' अनिवार्य केल्यानंतर खरीप हंगामातील फळपिक विमा योजनेत मोठा पेच उभा राहिला आहे. (Farmer Unique ID Cards)
यवतमाळसह सात जिल्ह्यांतील तब्बल ३ लाख २० हजार शेतकरी अजूनही फार्मर आयडीच्या प्रक्रियेबाहेर आहेत. यामुळे हे शेतकरी विमा संरक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता असून, १५ जूनपर्यंत आयडी तयार करणे आता जवळपास अशक्यच मानले जात आहे. (Farmer Unique ID Cards)
विम्याशिवाय शेतकऱ्यांचे फळपिक धोक्यात
हवामान आधारित फळपिक विमा योजना 'पुनर्रचित' स्वरूपात लागू करण्यात आली आहे. यामध्ये आंबिया आणि मृग बहार यांसारख्या फळपिकांसाठी विमा संरक्षण देण्यात येते. मात्र, फार्मर आयडीशिवाय कोणताही विमा मंजूर केला जाणार नाही, असे आदेश कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी काढले आहेत.
जिल्हानिहाय शेतकऱ्यांची स्थिती
यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, पालघर
एकूण शेतकरी : १७.८७ लाख
आयडी काढले : १४.६७ लाख
आयडीविना शेतकरी : ३.२० लाख
नुकसान भरपाईही शक्य नाही
हवामान बदलांमुळे फळपिकांचे नुकसान झाल्यास विमा नसलेल्या शेतकऱ्यांना कोणतीही नुकसानभरपाई मिळणार नाही. कोट्यवधींच्या नुकसानीपुढे शेतकऱ्यांची हतबलता वाढण्याची शक्यता आहे.
तांत्रिक आणि व्यवहार्य अडचणी
* अनेक शेतकऱ्यांच्या आधार कार्डला मोबाईल लिंक नसल्याने OTP मिळत नाही.
* स्थलांतरित व परराज्यातील शेतकरी अद्याप नोंदणी करू शकलेले नाहीत.
* काही शेतकरी मयत असून जमिनीचे फेरफार न झाल्याने, वारसदार आयडी तयार करू शकले नाहीत.