- प्रमोद पाटील
जळगाव : कासोदा येथील शेतकऱ्याने आपल्या आठ एकर शेताच्या बांधावर ३५० आंब्याची रोपे जगवली आहेत. यंदा यातील काही झाडांना चांगला मोहोर देखील आला आहे. शेतातील पिकांसोबतच शेताचा बांधही उत्पन्न देऊ शकतो, हे या शेतकऱ्याने दाखवून दिले आहे.
कासोदा येथील हरी भिवा राक्षे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. आपल्या वडिलोपार्जित जमिनीवर ते वेगवेगळे प्रयोग करीत असतात. याआधी पाच एकर जमिनीत त्यांनी सीताफळ लावले होते, काही वर्षे चांगले उत्पन्न आले. परंतु गेल्या दोन-तीन वर्षापासून सीताफळावर मिलीबग या रोगाने आक्रमण केले. त्यामुळे बाजारात या फळांची मागणी घटली. पण नुकसानीमुळे खचून न जाता पुन्हा नव्या उमेदीने ते कामाला लागले.
शासनाच्या विविध योजनांमधील ठिबकसंच, गोठा, गाई-शी, कडबाकुट्टीमशीन, मिल्कमशीन, सोलरसंच बसवून आधुनिक पद्धतीने शेती व पूरक जोडधंदा सुरू केला आहे. शेतात ठिबकसंच असल्याने त्याचा योग्य वापर करून बांधावर लावलेल्या आंब्याच्या वृक्षांसाठी दररोज पाणी मिळेल अशी व्यवस्था केली आहे.
मडके लावून जगवली झाडे
हरि राक्षे यांच्या मालकीच्या शेताजवळून पाटाची चारी जाते, या चारीच्या आजूबाजूलाही त्यांनी रोपे लावली आहेत. रोपं जगवतांना ज्याकाळी ठिबक संच नव्हता, तेंव्हा यांनी प्रत्येक झाडाजवळ एक मोठे मडके (मातीचा माठ) ठेऊन त्यात आठ दिवसांत एकदा पाणी भरून ती रोपं जगवण्याचे मेहनतीचे काम देखील केले आहे. यासाठी श्रम व वेळ वाया जात असला तरी जिद्द होती. मोठी झालेली ही झाडं पाहण्यासाठी आता परिसरांतील शेतकरी या शेतीला भेंट देण्यासाठी येऊ लागली आहे.
आंब्यासोबतच जांभुळ, कविटाचीही झाडे
आंब्याच्या रोपांसोबतच बांधावर चिंच, जांभुळ, कविट, पपई, बोर अशा प्रकारची वेगवेगळी फळझाडेदेखील त्यांनी लावली आहेत. काळ्या आईच्या सेवेसोबतच राक्षे हे गायनाचाही छंद जोपासत आहेत. राक्षे यांनी ही रोपे आंब्याची कोय गोळा करुन घरीच जमिनीत उगवली,
तिला घरीच कलम करुन ही सर्व रोपे तयार केली आहेत. या झाडांची ते खुप काळजी घेतात. प्रत्येक झाडाची निगा राखतात. भविष्यात या फळझाडांतून चांगले उत्पन्न मिळेल. असा त्यांचा विश्वास आहे.
