मुंबई : जगातील एकमेव दुसऱ्या पिढीच्या (सेकंड जनरेशन) जैव-इथेनॉल प्रकल्पासाठी बांबू उपलब्ध करण्याकरिता पुढील तीन वर्षात ३० हजार शेतकऱ्यांना पुरवठा साखळीत जोडण्यात येणार आहे.
ही माहिती आसाम बायो इथेनॉल प्रा. लि. (एबीईपीएल) या कंपनीने दिली आहे. ४,९३० कोटी रुपयांच्या या प्रकल्पाची वार्षिक उत्पादनक्षमता ४९,००० दशलक्ष टन (एमटीपीए) आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये केले होते.
एबीईपीएल ही कंपनी सरकारी मालकीच्या नुमालीगड रिफायनरी लिमिटेड (एनआरएल) तसेच फिनलंड येथील फॉर्टम ३ बीव्ही, केम्पोलिस ओए यांची संयुक्त कंपनी आहे. सध्या मर्यादित कच्च्या मालाच्या उपलब्धतेमुळे एबीइपीएलचे काम पूर्ण क्षमतेने सुरू झालेले नाही.
या कंपनीच्या सीईओ रुपज्योती हजारिका यांनी सांगितले की, आसामच्या गोलाघाट जिल्ह्यातील नुमालीगड येथे असलेला हा प्रकल्प बांबूचा कच्चा माल म्हणून वापर करणारा जगातील एकमेव व्यावसायिक व दुसऱ्या पिढीचा जैव-इथेनॉल प्रकल्प आहे. इतर सर्व पहिल्या पिढीचे इथेनॉल प्रकल्प ऊस किंवा मका यांसारख्या पिकांवर आधारित असतात.
इथेनॉल निर्मितीसाठी दरवर्षी पाच लाख टन हिरव्या बांबूची आवश्यकता
एबीईपीएलच्या सीईओ रूपज्योती हजारिका यांनी सांगितले की, आमचा प्रकल्प इथेनॉलव्यतिरिक्त दरवर्षी १९,००० टन फर्क्युरल, ११,००० टन अॅसिटिक अॅसिड, ३२,००० टन द्रवरूप कार्बनडाय ऑक्साइड आणि २५ मेगावॅट हरित वीजनिर्मिती करणार आहे.
चाचणी उत्पादनादरम्यान आम्ही ९९.७ टक्के शुद्ध इंधन-गुणवत्तेचे इथेनॉल तयार केले. सामान्यतः ९९.५ टक्के शुद्धता अपेक्षित असते. या प्रकल्पात इथेनॉलच्या उत्पादनासाठी दरवर्षी पाच लाख टन हिरव्या बांबूची आवश्यकता असेल. त्यासाठी कच्चा माल मिळवण्याकरिता पुढील तीन वर्षांत ६० लाख रोपांचा वापर करून १२,५०० हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवड करावी लागेल.
