नाशिक : शेतकऱ्यांना दिवसा सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने सौर कृषिपंप योजना (saur Krushi Pump Yojana) सुरू केली. या योजनेंतर्गत सौर ऊर्जेवर चालणारे कृषिपंप (Krushi Pump) उपलब्ध करून दिले जाणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. ही योजना शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणारी असून, तिच्या माध्यमातून वीजबचत, पर्यावरणपूरक शेती आणि पाण्याचा कार्यक्षम वापर होणार आहे, अशी अपेक्षा होती.
मात्र त्याचा लाभ शेतकरी वर्गाला होत नसून त्यांची या योजनेमुळे फसवणूक होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. मात्र या योजनेची अंमलबजावणी अत्यंत संथगतीने होत असल्याचे वास्तव समोर आले आहे. मागील चार ते पाच महिन्यांपूर्वी अनेक शेतकऱ्यांनी या योजनेंतर्गत अर्ज भरले असून, शासनाला आवश्यक आर्थिक हिस्सा देखील भरलेला आहे.
तथापि, त्यांच्या शेतात सौर कृषिपंप (saur Krushi Pump) बसविले गेलेले नाहीत. सध्या वीजपुरवठा अनियमित असल्यामुळे शेतकऱ्यांना दिवसाच्या वेळी पाणी देण्यात मोठी अडचण येत आहे. अशा परिस्थितीत सौर कृषिपंप हे एक आशेचे किरण ठरू शकले असते. मात्र योजनेतील विलंब आणि यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.
कोट्यवधींचा निधी
मंजुरी असून प्रत्यक्ष अंमलबजावणी नाहीच या योजनेसाठी केंद्र व राज्य शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. तरीही अर्ज मंजूर असूनही प्रत्यक्षात सौर पंप बसविले जात नाहीत, हे शासन आणि संबंधित यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे.
नियमानुसार दोन महिन्याच्या आत पंप बसविले पाहिजे. परंतु, आम्ही पैसे भरून सात ते आठ महिने झाले आहेत. तरीही सौर कृषी पंप बसविले जात नाही. संबंधित कंपनीने त्वरित कृषी पंप बसून द्यावे.
- जयवंत अहिरे, शेतकरी