jamin Malki Hakk : पाश्चिमात्य देशांमध्ये सासूरवास-सूनवास असे काही असते का, हा एक संशोधनाचा विषय आहे. पण आपल्याकडे सून-जावई आणि सासू-सासरे हे नातंच काहीतरी वेगळं असतं. या नात्याला खूप कंगोरे असतात. अर्थात, अपवाद सगळीकडे असतातच. नुकतेच एक पक्षकार त्यांच्या मित्राच्या आईवडिलांना घेऊन आले होते. दुर्दैवाने त्या मित्राचं अकाली निधन झालं होतं. आईवडील मुलाच्या निधनाच्या धक्क्यातून आता कुठे थोडे सावरत होते, तर मध्येच कायदेशीर सल्ल्यासाठी त्यांना माझ्याकडे यावं लागलं होतं.
वडील म्हणाले, 'माझी स्वकष्टार्जित संपत्ती खूप आहे, परंतु आमच्या सूनबाईची रीतच न्यारी. तिचं वागणं खूप विचित्र आहे.' त्यांना तोडत आई म्हणाल्या, 'अहो काय सांगू, माझा मुलगा तिच्या ताटाखालचं मांजर झाला होता! आमचं तिच्याशी अजिबात पटत नाही. ती आता आमच्या एकुलत्या एक नातवाला घेऊन माहेरी गेली आहे आणि जाताना 'माझा प्रॉपर्टीमधला हक्क मी घेईनच' अशी धमकीही देऊन गेली आहे.'
मी विचारलं, 'तुमचा नेमका प्रश्न काय आहे?'
'भले आम्ही सगळी संपत्ती दान करू, पण सुनेला यातली एक कवडीसुद्धा देणार नाही...' आईवडील एका सुरात म्हणाले. आपल्या स्वकष्टार्जित मिळकतीत, मुलाच्या पश्चात सुनेला वाटा देणं आवश्यक आहे का? ती कोर्टात जायच्या आधी आम्हीच जावं का? असे प्रश्नही त्यांना पडले होते. तसे सल्ले नातेवाईकच देत असल्याचंही त्यांनी सांगितलं. मी त्यांना म्हटलं, 'स्वकष्टार्जित मिळकत ही सासऱ्यांची असते. तेव्हा, त्यांच्या हयातीत त्यांच्या स्वतःच्या पत्नीला आणि मुलांना कुठलाही हक्क प्राप्त होत नाही.
जर, तुमच्या मुलाला आणि मुलीलाच असा हक्क नसेल तर सुनेला किंवा जावयाला तो कुठून येणार? आपल्या स्वकष्टार्जित मिळकतीचं काय करायचं, कायद्याच्या भाषेत त्याचा उपभोग घ्यायचा, ती मिळकत विकायची की दान करायची हा सर्वस्वी निर्णय त्या मिळकतीच्या मालकाचा म्हणजे या केसमध्ये तुमचा स्वतःचा आहे. या परिस्थितीत तुमच्या गेलेल्या मुलालाच कोणताही हक्क नसल्यामुळे त्याच्या बायकोला किंवा मुलांना म्हणजे तुमच्या नातवंडांना या मिळकतीत कुठलाही मालकी हक्क मिळणार नाही.'
हे ऐकून त्यांना एकदम हायसं वाटलं. त्याचवेळी कुठलंही वैध मृत्युपत्र तुम्ही केलं नाही, तर मात्र तुमच्या पश्चात हिंदू वारसा कायद्याच्या कलम ८ प्रमाणे 'क्लास-१ हेअर्स' म्हणून विधवा पत्नी, मुले हयात असेल, तर आई, मुलं आधीच निवर्तली असतील तर नातवंडं आणि गेलेल्या मुलाची पत्नी म्हणजेच सून या वारसांना मिळकतीत समान हक्क मिळतात हेही लक्षात आणून दिलं.
संपत्तीचे वारस आणि त्याबद्दल सल्ले देणारे 'निम हकीम' सगळीकडे असतात. ते पिना मारून नामानिराळे राहतात. मनस्ताप मात्र असे सल्ले ऐकणाऱ्यांना होतो. कोर्टात जायचा हक्क प्रत्येकाला आहे. पण कोर्टात गेलं म्हणजे निकाल आपल्याच बाजूने लागतो असं होत नाही.. 'तुमच्या केसमध्ये सूनबाई कोर्टात जाऊनही काही साध्य होणार नाही. उलट वेळ, पैसे आणि बाजारात न विकत मिळणारी मानसिक शांतता मात्र नक्की खर्च होईल. त्यामुळे एकुलता एक नातू ही दुधावरची साय आहे, त्या सायीसाठी तरी सुनेबरोबरची केमिस्ट्री सुधारता येते का पाहा'- असाही एक अनाहुत सल्ला मी दिला.
मालकी हक्काबाबतचे तीन प्रमुख गैरसमज
पहिला गैरसमज - अनेक लोकांना वाटत असतं की वैवाहिक साथीदाराच्या मृत्यूनंतर केवळ उर्वरित जोडीदारच आपोआप एकटा १००टक्के मालक होतो.
दुसरा गैरसमज - करारात पहिलं नाव ज्याचं असतं त्याचा हिस्सा किंवा अधिकार हा दुसरं नाव असलेल्यापेक्षा जास्त असतो आणि पहिलं नाव असलेली व्यक्ती मृत झाली की आपोआप सर्व हक्क दुसरं नाव असलेल्या व्यक्तीलाच मिळतो.
तिसरा गैरसमज - ७/१२ किंवा प्रॉपर्टी कार्ड हे मालकी हक्काचे पुरावे आहेत!!
- ॲड. रोहित एरंडे
जमीन मोजणी केली, पण मोजणीत तफावत आढळत आहे, काय करावे? वाचा संपूर्ण प्रक्रिया
