गडचिरोली : किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरीप पणन हंगाम (Kharif Season)) २०२४-२५ मध्ये केंद्र शासनाने मंजूर केलेल्या हमीभावाव्यतिरिक्त नोंदणीकृत शेतकऱ्यांना (नोंदणीकृत शेतकऱ्यांनी धान विक्री केली असो किंवा नसो) प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे.
धान लागवडीखालील जमीन धारणेनुसार प्रतिहेक्टरी २० हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेत दिले जाणार आहे. यासाठी शासनाकडून महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनला निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
खरीप पणन हंगाम २०२४-२५ मध्ये धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन राशी ही केवळ खरीप पणन हंगाम २०२४-२५ अंतर्गत धान पिकवणाऱ्या व ७/१२ वर धानाचा पीक पेरा असणाऱ्यांनाच लागू आहे. २५ मार्च २०२५ रोजी शासननिर्णय निर्गमित करून धानविक्रीसाठी नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन निधी हेक्टरी २० हजार रुपये देण्याचे जाहीर केले होते.
'आविम'ला निधी कधी मिळणार?
आदिवासी विकास महामंडळाच्या ५२ केंद्रांवरून मागील खरीप हंगामातील धान खरेदी करण्यात आली होती. या केंद्रावर नोंदणी करणाऱ्या सर्वच शेतकऱ्यांना धान बोनस मिळणार आहे. मात्र, आदिवासी विकास महामंडळाला अद्यापही निधी प्राप्त झालेला नाही. पाठपुरावा सुरू असल्याचे आदिवासी विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक सोपान संबारे यांनी 'लोकमत'ला सांगितले.
सद्यस्थितीत ४८ कोटी ८४ लाख २० हजार ८६८ रुपयांचा निधी जिल्ह्याला प्राप्त झालेला आहे. हा निधी मार्केटिंग फेडरेशनकडे नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आहे. जिल्ह्यात मागील खरीप हंगामातील धानाची खरेदी मार्केटिंग फेडरेशनच्या २३ केंद्रांवरून करण्यात आली होती.
बँकेच्या खात्यात रक्कम होणार जमा
गत तीन महिन्यांपासून शेतकरी बोनसच्या प्रतीक्षेत होते. अखेर मार्केटिंग फेडरेशनने जिल्हा मार्केटिंग कार्यालयांच्या बँक खात्यात १२ जून रोजी निधी वळता केला. आता जिल्हा कार्यालयांकडून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर बोनसची रक्कम वितरित केली जाणार आहे. येत्या तीन ते चार दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकते. लवकरच बोनस जमा झाल्याचे मेसेज मोबाईलवर वाजणार आहे. त्यामुळे खरीप हंगामात आधार होणार आहे.