गोंदिया : जिल्ह्यात रब्बी हंगामात ६५ हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात आली आहे. सध्या रब्बीतील धानपीक वाढण्यासाठी स्थिती असून या कालावधीत शेतकरी युरियाचा डोस देतात; मात्र आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम खतनिर्मितीवर झाला आहे.
गेल्या महिनाभरापासून युरियाची रॅक लागली नसल्याने शेतकऱ्यांना युरिया उपलब्ध होत नसल्याने त्यांची यासाठी भटकंती सुरू आहे. तर दुसरीकडे कृषी विभाग मात्र गेल्या खरीप हंगामातील ७ हजार ५०० मेट्रिक टन युरियाचा साठा उपलब्ध असून टंचाई नसल्याचे सांगत आहे.
जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी १७हजार ७१९ मेट्रिक टन युरिया, ३९९४९ मेट्रिक टन एसएसपी, ६६५३ मेट्रिक टन संयुक्त खते, ७५६६ मेट्रिक टन एमओपी आदी खतांची मागणी कृषी विभागाने शासनाकडे केली होती. तर मागील खरीप हंगामातील ७ हजार ५०० मेट्रिक टन यूरिया उपलब्ध आहे. रब्बीतील धानाची रोवणी आटोपल्यानंतर वाढीसाठी शेतकरी युरियाचा डोस देत असतात.
त्यामुळे या कालावधीत युरियाची बाजारपेठेत मागणी वाढत असते; मात्र गेल्या महिनाभरापासून आखाती देशात युद्ध सुरू असल्याने इंधन साखळी विस्कळीत झाली आहे. तर खत निर्मितीवर सुद्धा याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून युरिया खताची रैंक लागली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना युरिया मिळत नसल्याची ओरड वाढली आहे.
युरिया कुठे उपलब्ध याची माहिती संकेत स्थळावर
जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यातील कोणत्या कृषी केंद्राकडे किती टन युरिया उपलब्ध आहे याची माहिती शेतकऱ्यांना व्हावी, त्यांची दिशाभूल होऊ नये यासाठी कृषी विभागाने संकेतस्थळ तयार केले असून त्याची लिंक तयार केली आहे. या लिंकवर क्लिक केल्यास कोणत्या कृषी केंद्राकडे युरिया उपलब्ध आहे याची माहिती मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांना याची मदत होत असल्याचे कृषी विभागाच्च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
आज लागणार युरियाची रॅक
रब्बी हंगामातील युरियाची मागणी लक्षात घेऊन कृषी विभागाने १७ हजार ७१९ मेट्रिक टन युरियाची मागणी केली आहे. यापैकी युरियाची एक रॅक बुधवारी (दि.१) लागण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात युरियाची टंचाई नसून शेतकऱ्यांनी कुठल्याही अपप्रचाराला बळी पडू नये.
नीलेश कानवडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
