नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात कापसाचे मोठे क्षेत्र आणि बागायतदार शेतकऱ्यांकडून मे महिन्यात होणारी लागवड ही बाब लक्षात घेता महाराष्ट्रात प्रतिबंधित आणि काही ठिकाणी बोगस बीटी कापूस बियाण्यांची (Kapus Biyane) सर्रास विक्री केली जाते. मात्र दरवर्षी कारवाई होऊनही कृषी विभागाकडून ठोस पावले उचलण्याची गरज आहे.
जिल्ह्यातील शेतकरी जवळपास सव्वा लाख हेक्टरपर्यंत कापूस लागवड (Cotton Cultivation) करीत असतात. २० ते २५ हजार हेक्टर मे महिन्यातील लागवडीची असते. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा आहे ते शेतकरी खरीपपूर्व कापूस लागवड करीत असतात. त्यामुळे मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच जिल्ह्यात बीटी कापूस बियाणे (Kaapus Biyane Vikri) विक्रीसाठी येत असतात. दरम्यान, यंदा असा प्रकार होऊ नये यासाठी कृषी विभाग (Agriculture News) आणि जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. थेट गुन्हे दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
शेतकऱ्यांना असणारी घाई व विशिष्ट वाणाची मागणी लक्षात घेता बोगस बियाण्याच्या विक्रीचे प्रमाण वाढते. त्यातच राज्यात प्रतिबंधित व गुजरातमध्ये उत्पादित अनेक बीटी बियाणे सर्रास विक्री केली आते. ही बाब लक्षात घेता अनेक शेतकऱ्यांना त्याचा फटका बसतो. उत्पादन कमी येते, उगवण क्षमतादेखील कमी असते. त्यामुळे अशा बियाण्यांवर लक्ष ठेवले जाते. त्यासाठी गुणवत्ता नियंत्रण आणि भरारी पथकांची नेमणूक करण्यात येणार आहे.
खरीपपूर्व लागवड २० हजार हेक्टरपर्यंत...
जिल्ह्यात कापसाची लागवड गेल्यावर्षी एक लाख २० हजार हेक्टरपर्यंत झाली होती. यंदादेखील त्याच प्रमाणात लागवड होण्याची शक्यता आहे. शहादा, नंदुरबार, तळोदा, नवापूर या तालुक्यात सर्वाधिक लागवड केली जाते. या भागातील शेतजमीन कापूस पिकासाठी योग्य असल्याचे कृषी विभागाचे म्हणने आहे.
पूर्वी अर्थात १० वर्षांपूर्वी कापसाचे क्षेत्र ४८ हजार हेक्टर होते. दहा वर्षांत ते दुपटीने वाढले आहे. येत्या काळातदेखील वाढण्याची शक्यता आहे. यंदा कापसाला भाव कमी होता. शेवटपर्यंत तो चढलाच नाही. येत्या हंगामात भावाबाबत काय स्थिती असते याबाबतची उत्सुकता आहेच.
कोरडवाहू आणि बागायतदार शेतकरी कापूस लागवड करीत असतात, कोरडवाहू शेतकरी पावसाच्या पाण्याच्या भरवशावर लागवड करतात. जर पावसाने ताण दिला, कमी पाऊस झाला तर अशा शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागतो. त्यामुळे अशा शेतक-यांची सर्व भिस्त पावसावरच अवलंबून असते.
गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणावर कारवाई...
गेल्यावर्षी बोगस आणि राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित जवळपास ३० ते ३५ लाख रुपयांची बीटी कापूस बियाणे कृषी विभागाने जप्त केली होती. सर्वाधिक बियाणे ही गुजरात राज्याच्या हद्दीलगत असलेल्या गावांमधूनच जप्त करण्यात आली होती. यात नंदुरबार तालुका, अक्कलकुवा तालुक्यासह शहादा तालुक्यातील कारवाईचादेखील समावेश होता.
चांगल्या प्रतीची, चांगल्या कंपनीची आणि माफक दरात बियाणे असल्याचे भासवून शेतकऱ्यांच्या माथी ते मारले जातात. शेतकरीदेखील सहजरीत्या चांगले बियाणे उपलब्ध होत असल्याचे पाहून त्याला भुलून खरेदी करतात आणि त्यातच ते फसतात. ग्राहक मंचात संबंधित कंपनीवर दावादेखील लागू होत नसल्याने शेतकरी पूर्णतः फसतो.