योगेश देऊळकार
खरीप हंगाम सुरू होण्याआधीच शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होताना दिसत आहे. सोयाबीन व कपाशी बियाण्यांचा कृत्रिम तुटवडा भासवत व्यापाऱ्यांकडून दरवाढ; खत खरेदीची सक्तीही करताना दिसत आहेत. (Biyancha Tutvada)
संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात खरीप हंगामासाठी सोयाबीन आणि कपाशीच्या विशिष्ट वाणांच्या बियाण्यांचा कृत्रिम तुटवडा जाणवू लागला आहे. या टंचाईचा गैरफायदा घेत काही व्यापाऱ्यांनी बियाण्यांचे दर शासकीय दरांपेक्षा ३०० रुपयांनी अधिक आकारण्यास सुरुवात केली आहे. (Biyancha Tutvada)
बियाण्यांचे दर गगनाला
काही दिवसांपूर्वी २ हजार ७०० रुपयांना मिळणारी एक बॅग आता ३ हजार रुपयांना विकली जात आहे. या दरवाढीमुळे शेतकऱ्यांवर आर्थिक भार वाढला असून पेरणीपूर्वीच तणाव वाढला आहे. याशिवाय काही विक्रेत्यांनी एका पाऊचसोबत खताची बिनपावती बॅग घेणे अनिवार्य अशी सक्ती केल्याने शेतकरी संभ्रमात आहेत.
वाढीव दर, टंचाई आणि सक्ती
शेतकऱ्यांनी या परिस्थितीविरोधात आवाज उठवायला सुरुवात केली आहे. कृषी विभागाने कारवाईचे संकेत दिले असले, तरी प्रत्यक्षात बाजारात हे प्रकार खुलेआम सुरू आहेत.
बियाण्यांचे वाण, दर व साठवणूक याची खातरजमा करून पावती घ्या. शंका असल्यास तक्रार निवारण यंत्रणेकडे लेखी तक्रार करा, असे कृषीतज्ज्ञांनी आवाहन केले आहे.
सोयाबीन व कपाशी बियाण्यांचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट करताना दिसत आहेत. खरीप हंगाम अगदी जवळ असतानाही बाजारात बियाण्यांची टंचाई, दरवाढ आणि सक्तीच्या अटींमुळे शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
एका पाऊचमागे खत खरेदीची अट!
कपाशीच्या बीटी वाणांना शेतकऱ्यांकडून वाढती मागणी असतानाही त्यांची उपलब्धता मर्यादित आहे. या संधीचा गैरफायदा घेत काही बियाणे विक्रेते एका पाऊचसोबत एक बिनपावती खताची बॅग खरेदी करण्याची अट लावत आहेत. या सक्तीमुळे शेतकऱ्यांना अनावश्यक खर्चाचा सामना करावा लागत असून, त्यांचे आर्थिक गणित बिघडत आहे.
३ वर्षांपासून शेतकऱ्यांना आर्थिक फटका
गत तीन वर्षांपासून ऐन पेरणीच्या तोंडावर बियाण्यांचा तुटवडा भासत आहे. यामुळे शेतकऱ्यांना नाइलाजास्तव अतिरिक्त खर्च करावा लागत असल्याने आर्थिक फटका बसत आहे. याकडे कृषी विभागाने लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
खरेदी करताना लक्षात ठेवा
* पावती घ्या
* अधिकृत दुकानातूनच खरेदी करा
* अनधिकृत विक्रेत्यांकडे बियाणे घेणे टाळा
* खत खरेदीची सक्ती असल्यास त्वरित कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रार नोंदवा
बियाण्यांची जादा दराने विक्री होऊ नये, याकरिता कृषी केंद्रांवर पथकाच्या माध्यमातून नजर ठेवण्यात येत आहे. जिल्ह्यातील तेराही तालुक्यांमध्ये पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तरीदेखील शासकीय किमतीपेक्षा जास्त दराची आकारणी करणाऱ्या कृषी केंद्रचालकांवर कारवाई करण्यात येईल. - मनोजकुमार ढगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी