Banana Export : पारंपरिक शेतीपुरतीच मर्यादित न राहता नव्या संधींचा शोध घेणाऱ्या तळेगाव बुद्रुक येथील प्रयोगशील शेतकरी विलास खारोडे यांनी केळी पिकामध्ये शास्त्रशुद्ध व्यवस्थापन व आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून थेट परदेशी बाजारपेठ गाठली आहे. (Banana Export)
त्यांच्या शेतातून तब्बल १ हजार ५०० क्विंटल निर्यातक्षम केळीची पहिली खेप इराणसाठी रवाना झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांसाठी ही यशकथा प्रेरणादायी ठरत आहे.(Banana Export)
केळी लागवडीपूर्वी माती परीक्षण, योग्य जातीची निवड, अंतर पद्धत, ठिबक सिंचन आणि संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन यावर खारोडे यांनी विशेष भर दिला.(Banana Export)
पिकाच्या प्रत्येक टप्प्यावर निरीक्षण ठेवून रोग-कीड नियंत्रण, पाणी व्यवस्थापन आणि वेळेवर खतांचा वापर करण्यात आला. परिणामी केळीचे घड आकाराने एकसमान, वजनदार आणि दर्जेदार तयार झाले.(Banana Export)
काढणीच्या योग्य टप्प्यावर केळी तोडण्यात आली. घड स्वच्छ करून आंतरराष्ट्रीय मानकांनुसार ग्रेडिंग व बॉक्स पॅकिंग करण्यात आले. त्यानंतर सुमारे १ हजार ५०० क्विंटल केळी ट्रकमधून दिल्लीकडे पाठवण्यात आली असून, पुढे कंटेनरद्वारे ती इराणमध्ये निर्यात केली जाणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेसाठी प्रगतशील शेतकरी सचिन कोरडे यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले.(Banana Export)
या यशस्वी उपक्रमाची दखल घेत तालुका कृषी अधिकारी शुभम बुरांडे व मंडळ कृषी अधिकारी गौरव राऊत यांनी केळी बागेला भेट देऊन खारोडे यांचे कौतुक केले. यावेळी त्यांनी फळपिकांसाठी उपलब्ध शासकीय अनुदान योजना, निर्यात संधी आणि बाजारपेठ व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
पारंपरिक पिकांसोबत फळपिकांची जोड दिल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न निश्चितच वाढू शकते, असे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
केळीच्या या यशस्वी निर्यातीमुळे विलास खारोडे यांची शेती केवळ उत्पादनापुरती मर्यादित न राहता जागतिक बाजारपेठेशी जोडली गेली आहे.
योग्य नियोजन, आधुनिक तंत्रज्ञान आणि सातत्यपूर्ण मेहनत यांच्या जोरावर फळपिकांमधूनही शाश्वत उत्पन्न मिळू शकते, हे त्यांनी आपल्या यशातून सिद्ध केले आहे.
