Banana Crop Damage : नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात सोमवारी (९ जून) रोजी संध्याकाळी मृग नक्षत्रावर (Mrig Nakshatra) आलेल्या वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे उभे पीक अक्षरशः मुळासकट उद्ध्वस्त झाले. (Banana Crop Damage)
या भागात मुख्यतः केळी व पपई या दोन प्रमुख पिकांना मोठा फटका बसला असून, अर्धा तास सुरू असलेल्या तुफान वाऱ्याने हजारो हेक्टरवरील केळीची झाडे भुईसपाट केली. शेतकऱ्यांनी वर्षभर मेहनतीने उभा केलेला पीक हातातोंडाशी आलेला असतानाच निसर्गाच्या कोपामुळे उद्ध्वस्त झाले. (Banana Crop Damage)
अर्धापूर तालुक्याला मुख्य फटका
अर्धापूर, दाभड व मालेगाव मंडळांमध्ये केळी पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड झाली होती. अर्धापूर हे केळीचे माहेरघर मानले जाते. येथील अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचा आधारच केळी हे पीक आहे.
सोमवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास ताशी १५० ते १६० किमी वेगाने वादळ वाहू लागले. यामुळे निमगाव, खैरगाव, पार्डी, चाभरा, चोरंबा परिसरातील शेतांतील केळी व पपई झाडे जमिनीवर कोसळली. रस्त्यावरील झाडे व विद्युत खांब उन्मळून पडल्यामुळे वाहतूक व वीजपुरवठाही खंडित झाला होता.
शेतकऱ्यांच्या व्यथा
खैरगाव येथील शेतकरी राजेश लांडगे यांच्या ३ हजार ८०० केळी झाडांची काढणी फक्त आठवडाभरात होणार होती. त्यांनी केळीचे ११ लाखांचे सौदे केले होते. परंतु वादळामुळे संपूर्ण बाग उद्ध्वस्त झाली. लहान येथील अन्नपूर्णाबाई इंगळे यांचेही ७०% केळी पीक वाऱ्यामुळे आडवे पडले असून, चार लाखांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले.
प्रशासनाची हालचाल
खासदार अशोक चव्हाण यांच्या सूचनेवरून तहसीलदारांना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असून, अधिकारी व कर्मचारी सर्वेक्षण करत आहेत. यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री अतुल सावे यांना निवेदन देऊन आर्थिक मदतीची मागणी करण्यात येणार आहे.
देगलूर तालुक्यातही वादळाचा कहर
रविवारी रात्री देगलूर शहरासह तालुक्यात प्रचंड वादळी वाऱ्याने हजेरी लावली. विजेच्या कडकडाटासह पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, विद्युत खांब वाकले, पाच घरांची पडझड झाली आणि एक म्हैस ठार झाली.
वाहतूक व वीज पुरवठा यावरही मोठा परिणाम झाला होता. विद्युत मंडळाचे कर्मचारी युद्धपातळीवर काम करत असून सोमवार दुपारीपासून काही भागांत वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.
तत्काळ नुकसान भरपाई देऊन शेतकऱ्यांना सावरण्यासाठी मदतीचा हात दिला जावा, अशी एकमुखी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. खरीप हंगाम सुरू होण्याच्या तोंडावर आलेल्या या आपत्तीतून त्यांना सावरण्यासाठी शासनाने सकारात्मक पावले उचलण्याची गरज आहे.
हिमायतनगर, मुखेड, भोकर येथे पावसाची हजेरी
मृग नक्षत्राच्या पहिल्या पावसाची प्रतीक्षा असलेल्या शेतकऱ्यांना सोमवारी दिलासा मिळाला. जिल्ह्यात ठिक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. यामध्ये हिमायतनगर येथे वादळीवाऱ्यासह पाऊस झाला. त्यानंतर भोकर येथेही सोमवारी सायंकाळी ७.४५ वाजता पावसाने हजेरी लावली. अर्धापूर तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे केळीच्या बागा आडव्या पडल्या. तसेच झाडे उन्मळून पडली.