Bamboo Sheti : शेतीतून सातत्याने मिळणारे उत्पन्न, पर्यावरण संरक्षण आणि रोजगार यांची सांगड घालणारे बांबू पीक बुलडाणा जिल्ह्यात नव्या आशेचा किरण बनून उगवत आहे.(Bamboo Sheti)
जिल्ह्यात यंदा तब्बल ३ लाख ७६ हजारांहून अधिक बांबू रोपांची यशस्वी लागवड करण्यात आली आहे. शासनाच्या 'बांबू मिशन' (Bamboo Mission) उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांसाठी ही एक शाश्वत आणि फायद्याची संधी ठरत असून, सातपुड्याच्या डोंगर उतारावरील मोकळ्या जमिनींना नवजीवन मिळाले आहे. (Bamboo Sheti)
जिल्ह्यात ३.७६ लाख बांबू रोपांची लागवड यशस्वी
बुलडाणा जिल्ह्यात २०२४-२५ या आर्थिक वर्षात ३ लाख ७६ हजार ८३० बांबू रोपांची लागवड करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत ८२१ शेतकऱ्यांनी ४९५.२९ हेक्टर क्षेत्रावर लागवड पूर्ण केली आहे.
विशेष म्हणजे, २.८५ लाख रोपे खासगी जमिनीत तर ९१ हजार ७५० रोपे शासकीय जमिनीत लावण्यात आली आहेत.
शाश्वत शेती आणि मृदसंधारणास चालना
सातपुड्याच्या डोंगर उतारावरील भुसभुशीत जमिनीत बांबूची जोमाने वाढ होते. झाडांची मुळे जमिन धरून ठेवतात त्यामुळे मृदसंधारणही सहज घडून येते. त्यामुळे शेतीला पूरक, पर्यावरणपूरक आणि उत्पन्न देणारी अशी ही लागवड ठरत आहे.
रोजगार हमी योजनेची सांगड
शासनाने बांबू मिशनला रोजगार हमी योजनेशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे स्थानिक कुटुंबांनाही कामाच्या संधी उपलब्ध होत आहेत. पुढील वर्षासाठी (२०२५-२६) लागवड व एनआरएम संदर्भात नियोजन सुरू झाले आहे.
इतर विभागांचा सहभाग
कृषी विभागाने ६४०.३६ हेक्टरवर ६६७ शेतकऱ्यांच्या माध्यमातून लागवड केली आहे. सामाजिक वनीकरण विभागानेही २२ हजार ९४७ रोपे पुरामुळे नुकसान होणाऱ्या पट्ट्यात लावून सहभाग दर्शवला आहे.
उत्पन्नात सातत्य
मी कोणतीही योजना न घेता बांबू लागवड केली असून, त्याचे पीक चांगले बहरले आहे. उत्पन्नासाठी थोडी वाट पाहावी लागते (२.५ ते ३ वर्षे), पण एकदा सुरु झाले की त्यात सातत्य असते. - गोपाल सावरकर, शेतकरी, भालेगाव