Join us

Awakali Paus: अवकाळीचा मराठवाड्यात कहर; पिकांचे नुकसान वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2025 15:20 IST

Awakali Paus : मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसामुळे दोन मृत्यूंसह, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले आहे. सरकारने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे. दरम्यान, हवामान खात्याने पुढील काही दिवसांमध्ये वातावरण ढगाळ राहण्याचा इशारा दिला आहे. वाचा सविस्तर (Marathwada Unseasonal Rains)

Awakali Paus :मराठवाड्यात अवकाळी पावसाने मोठा धुमाकूळ घातला. परभणी, नांदेड, हिंगोली आणि औरंगाबाद जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्यामुळे शेती व फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. (Marathwada Unseasonal Rains)

याच दरम्यान वीज कोसळून परभणी व नांदेड जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गेल्या चार दिवसांपासून अनेक भागांत पावसाची हजेरी कायम असून, यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या चिंतेत सापडला आहे. (Awakali Paus)

रोहिला पिंपरीमध्ये विजेचा शॉक, १९ वर्षीय तरुण ठार

परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील रोहिला पिंपरी शिवारात भरत गंगाधरराव पिसाळ (वय १९) या तरुणाचा शेतात काम करत असताना विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. 

शनिवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. भरत आपल्या शेतात नियमित काम करत असताना अचानक वातावरणात बदल होऊन वीज कोसळली. त्याला तत्काळ बोरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती मृत घोषित केले.

हिमायतनगरमध्ये शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

दुसरी दुर्दैवी घटना नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात घडली. अजगर खान मियाँ खान (वय ६२) हे शेतकरी शेळ्या चारण्यासाठी शेतात गेले असताना, अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसात त्यांच्यावर वीज कोसळली. 

ही घटना दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. वीज पडताच त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि महसूल प्रशासन घटनास्थळी पोहोचले. नायब तहसीलदार सूर्यकांत ताटेवाड यांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला.

परभणीत चार दिवसांपासून अवकाळी पाऊस

परभणी जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. शनिवारी दुपारी तीनपासून जिंतूर, सेलू, मानवत रोड, सोनपेठ, पालम, बोरी परिसरात जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने जनजीवन विस्कळीत केले. 

येलदरी, ताडकळस, झरी, आडगाव बाजार, एरंडेश्वर, खुजडा या भागांत विजांचा कडकडाट होत पाऊस झाला. अनेक ठिकाणी शेतकरी शेतात काम करत असताना पावसामुळे कामे थांबवावी लागली.

हिंगोलीत वादळी वाऱ्याचा तडाखा, फळबागांचे नुकसान

हिंगोली जिल्ह्यात शनिवारी दुपारी २.३० वाजता वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस झाला. हिंगोली शहरासह वसमत, औंढा नागनाथ, कळमनुरी, सेनगाव तालुक्यात याचा मोठा प्रभाव जाणवला. 

पावसामुळे बाजारपेठांमध्ये वाहतूक विस्कळीत झाली. तापमान ४२ अंशांवरून ३६ अंशांपर्यंत खाली आले, मात्र फळबागांना जोरदार फटका बसला. भुईमुग, कांदा, मका यासारख्या पिकांची काढणी सुरू असताना पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

कन्नड तालुक्यात शेडनेट उडाले, केळीच्या बागा उद्ध्वस्त

औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील पिशोर, नाचनवेल, मोहंद्री, चिंचोली लिंबाजी, बालखेड, वाकी, जामडी या भागांमध्ये शनिवारी दुपारी जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाचा कहर झाला. 

शेतकऱ्यांच्या शेडनेट संरचना उडून गेल्या, तर केळी, आंबा, कांदा बियाणे, मका, बाजरी यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तुषार जाधव, बाबूराव जाधव, गणेश जाधव या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, अनेक शेतांमध्ये साचलेले पाणी पीक खराब करत आहे.

सिल्लोडच्या केन्हाळा गावात १८ तास वीज खंडित

सिल्लोड तालुक्यातील केन्हाळा गावात वादळी वाऱ्यामुळे झाडे विद्युत खांबांवर कोसळल्याने वीजपुरवठा पूर्णतः खंडित झाला. तब्बल १८ तासानंतर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न करून शनिवारी सायंकाळी वीजपुरवठा सुरळीत केला. 

या काळात ग्रामस्थांना पाणी, अन्नधान्य दळणे, मोबाईल चार्जिंग यासारख्या गोष्टींमध्ये प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला.

हे ही वाचा सविस्तर : Pik Vima Yojana: शेतकऱ्यांची पुन्हा फसवणूक? किरकोळ कारणांनी पीकविमा नाकारला वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रहवामान अंदाजपाऊसमराठवाडा