जालना : शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढवण्यासाठी जालना जिल्ह्याने मोठे पाऊल उचलले आहे. (AI Farming)
जिल्हा प्रशासन आणि महाराष्ट्र कृषी विभागाच्या पुढाकारातून 'सुपर ५० एआय फार्मर्स' हा अभिनव पायलट प्रकल्प सुरू करण्यात आला असून, आता ऊस शेतीचे व्यवस्थापन उपग्रह (Satellite) आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) यांच्या मदतीने होणार आहे.(AI Farming)
जिल्ह्याच्या ४५ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित 'रायझिंग जालना' सोहळ्यात या प्रकल्पाचा सामंजस्य करार करण्यात आला. (AI Farming)
यावेळी पालकमंत्री पंकजा मुंडे, आमदार अर्जुन खोतकर, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, कृषी विभागाचे अधिकारी, फाईडेबिलिटी सायन्सेसची तांत्रिक टीम आणि जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकरी उपस्थित होते.
सुरुवातीला हा प्रकल्प ५० शेतकऱ्यांपुरता मर्यादित असला तरी, याच्या यशानंतर संपूर्ण जिल्ह्यात आणि पर्यायाने राज्यात हा 'जालना पॅटर्न' राबवला जाण्याची शक्यता आहे.
पारंपरिक शेतीला विज्ञानाची जोड देऊन शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करणे आणि नफा वाढवणे हे या उपक्रमाचे अंतिम उद्दिष्ट आहे.
विशेष म्हणजे या प्रक्रियेत शेतकऱ्याला शेतात कोणतेही महागडे सेन्सर लावण्याची गरज पडणार नाही, सर्व माहिती सॅटेलाइटच्या माध्यमातून गोळा केली जाणार आहे. एकूणच या प्रकल्पाचा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे.
काय मिळणार ॲपवर ?
पीक आरोग्य स्कोअर
ऊस पिकाची सद्यः स्थिती आणि आरोग्य किती टक्के चांगले आहे, याची माहिती.
पाणी व खत व्यवस्थापन
शेताच्या कोणत्या भागात खताची आणि पाण्याची गरज आहे, याचे अचूक मार्गदर्शन.
तण व रोग ओळख
शेतातील तण आणि संभाव्य रोगांची आगाऊ सूचना.
कापणी नियोजन
ऊसतोडणीसाठी योग्य वेळ कोणती, याचे शास्त्रोक्त विश्लेषण.
८ तालुके आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनाही या प्रकल्पाशी भविष्यात जोडून घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
जिल्ह्यात 'स्मार्ट फार्मर'
जालना जिल्ह्याच्या या उपक्रमामुळे आता ऊसउत्पादक शेतकरी केवळ कष्टकरी न राहता 'स्मार्ट फार्मर' म्हणून ओळखला जाणार आहे.
तंत्रज्ञानाच्या या क्रांतीमुळे कृषी क्षेत्रात एक नवी पहाट उजाडेल, असा विश्वास यावेळी पालकमंत्री पंकजा मुंडे आणि जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी व्यक्त केला.
प्रकल्पाचे वेगळेपण आणि फायदा
विनाखर्चिक तंत्रज्ञान
शेतात कोणत्याही महागड्या उपकरणांची किंवा सेन्सर्सची आवश्यकता नाही.
अचूकता
सॅटेलाइट डेटाचा वापर केल्यामुळे मानवी त्रुटीची शक्यता कमी.
वेळेची बचत
घरबसल्या मोबाइलवर शेतातील प्रत्येक कोपऱ्याची माहिती मिळणार.
उत्पादनात वाढ
योग्यवेळी योग्य खत आणि पाणी मिळाल्याने उसाच्या टनेजमध्ये वाढ अपेक्षित.
