राजू गायकवाड
गुढीपाडव्याचा दिवस हा शेतकऱ्यांसाठी केवळ सण नसून नव्या शेती वर्षाची सुरुवात मानला जातो.(Agriculture Planning Tips)
या दिवशी शेतकरीशेतीची पूजा करून आगामी हंगामासाठी पीक नियोजन करतात, नांगरणीची सुरुवात करतात आणि सालगडीही ठरवतात. (Agriculture Planning Tips)
मात्र, बदलत्या हवामानामुळे आणि आर्थिक अडचणींमुळे शेतीसमोरील आव्हाने वाढत असताना, शेतकऱ्यांनी सकारात्मक दृष्टी ठेवून वर्षभराचे नियोजन करणे अत्यावश्यक असल्याचा सल्ला पुरस्कारप्राप्त शेतकरी अशोक वानखेडे यांनी दिला आहे.(Agriculture Planning Tips)
शेतीत नियोजनाचा अभाव महागात
शासकीय धोरणांतील बदल आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांची आर्थिक घडी विस्कटत चालली आहे.
पूर्वी एकत्रित कुटुंब पद्धतीमुळे शेती अधिक शाश्वत होती. मात्र, सध्या शेतीच्या वाटण्या झाल्याने उत्पादनावर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.
शेतीपूरक व्यवसायांची गरज
फक्त पारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता शेतकऱ्यांनी पूरक व्यवसायांचा विचार करणे काळाची गरज बनली आहे.
दुग्ध व्यवसाय
शेळीपालन
कुक्कुटपालन
भाजीपाला उत्पादन
रेशीम उद्योग
शेतमाल प्रक्रिया उद्योग (ज्वारी बिस्कीट, गव्हाचे पीठ, दालमिल)
या व्यवसायांची जोड दिल्यास उत्पन्नात वाढ होऊ शकते, असे वानखेडे यांनी सांगितले.
पीक बदलाचे महत्त्व
दरवर्षी एकाच पिकाची लागवड केल्याने जमिनीचा कस कमी होतो आणि उत्पादन घटते. त्यामुळे पीकपद्धतीत बदल करणे आवश्यक आहे.
सोयाबीनऐवजी मका
चण्याऐवजी करडी (तेलवर्गीय पीक)
रबी ज्वारीचा पर्याय
कपाशी पिकासाठी जास्त कालावधी आणि खर्च लागतो, त्यामुळे मजूर टंचाई लक्षात घेऊन पीक निवडणे महत्त्वाचे आहे.
६० एकर शेतीत यशस्वी प्रयोग
अशोक वानखेडे यांच्या कुटुंबाकडे ६० एकर शेती असून तब्बल ४२ सदस्य एकत्रितपणे शेतीत काम करतात. खरीप व रबी हंगामातील विविध पिकांसोबत फळबागांची लागवड करून त्यांनी उत्पन्नात वाढ साधली आहे. योग्य नियोजनामुळे त्यांना कर्ज घेण्याची वेळ आली नसल्याचे ते सांगतात.
मजूर टंचाई आणि शेतीवरील परिणाम
शासनाच्या विविध योजनांमुळे मजुरांची उपलब्धता कमी होत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. त्यातच नैसर्गिक आपत्तीमुळे उत्पादन घटत असल्याने अनेक अल्पभूधारक शेतकरी शेती सोडून शहरांकडे स्थलांतर करत आहेत.
गुढीपाडव्याच्या शुभदिनी शेतीच्या नव्या वर्षाची सुरुवात करताना शेतकऱ्यांनी केवळ पारंपरिक पद्धतीवर न राहता आधुनिक आणि नियोजनबद्ध शेतीकडे वळणे आवश्यक आहे.
संकटे असली तरी योग्य नियोजन, पीक बदल आणि पूरक व्यवसायांच्या मदतीने शेती अधिक फायदेशीर बनवता येऊ शकते.
अधिक वाचा : Palash tree benefits : 'पळस' दिसतो साधा, पण गुणधर्म ऐकून तुम्ही चकित व्हाल!
