नाशिक : नाशिक जिल्ह्यातील बहुतांश भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस (Unseasonal rain) झाल्याने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यात डांगसौंदाणे परिसरात शेतकऱ्यांनी साठवलेल्या कांदा चाळ वादळात सापडली. चाळ थेट कोलमडून पडल्याने कांद्याचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे.
नाशिक जिल्ह्यातील (Nashik District Rain) येवला, निफाडसह इतर परिसरात काल सायंकाळच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. यात वादळी वाऱ्याचाही समावेश असल्याने शेतकऱ्यांची प्रचंड तारांबळ उडाली. अनेक ठिकाणी कांदा काढणी सुरु असल्याने मोठे नुकसान झाले. डांगसौंदाणे येथील निवृत्ती भागा सोनवणे या शेतकऱ्याने कांदा चाळीत (Kanda Chal) भरून ठेवला होता. वादळी वाऱ्याने चाळीसकट कांदा बाहेर फेकून दिला. यात चाळीवरील पत्रे उडून गेले. संपूर्ण कांदा पाण्यात भिजला.
दरम्यान यापूर्वीच कांद्याला अवकाळी पावसाचा फटका बसला होता. मात्र त्यावेळी शेतकऱ्यांनी मेहनत घेत कांद्याचे उत्पादन काढले. आता पुन्हा साठवणूक केलेल्या कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत सापडला आहे. त्यामुळे शेती पिकाचे व साठवलेल्या कांद्याचे पंचनामे करण्यात यावेत व भरपाई देण्यात यावी, येथील शेतकऱ्यांनी केली आहे
अनेक ठिकाणी नुकसान काल झालेल्या अवकाळी पावसासह वादळी वाऱ्यात शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कांदा काढणी सुरु असल्याने अनेक शेतकऱ्यांचा कांदा शेतातच पडून आहे. या पावसात हा कांदाही भिजला आहे. शिवाय भात उत्पादक शेतकऱ्यांनी वैरणीची तजवीज करून ठेवली होती. मात्र कालच्या पाण्यात आणि वाऱ्यात ता चाऱ्याचेही नुकसान झाले आहे.