Agriculture News : बीएआरसी आणि महाबीज यांच्यात झालेल्या करारामुळे जैविक कीटकनाशक, सेंद्रिय कर्ब परीक्षण पद्धत आणि ऊती-संवर्धित रोपांपर्यंत शेतकऱ्यांचा सहज प्रवेश होणार असून, शेती अधिक टिकाऊ आणि फायदेशीर होणार आहे.
महाराष्ट्र राज्य बीज महामंडळ (MahaBeej) आधुनिक शेतीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याच्या दिशेने मोठी झेप घेतली आहे. डॉ. भाभा आण्विक संशोधन केंद्र (BARC), मुंबई यांनी विकसित केलेली पाच महत्त्वाची कृषी तंत्रज्ञान महाबीजकडे अधिकृतरीत्या हस्तांतरित करण्यात आली. या तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना उच्च उत्पादनक्षमता, मातीची सुधारलेली गुणवत्ता आणि रोग-किड नियंत्रणात मोठा फायदा होणार आहे.
हस्तांतरित तंत्रज्ञान कोणती?
बीएआरसीने विकसित केलेली खालील पाच तंत्रज्ञान महाबीजकडे हस्तांतरित झाली
१- ट्रायकोडर्मा व्हायरेन्स – जैविक बुरशीनाशक
* शेतीतील बुरशीजन्य रोगांवर प्रभावी जैविक उपाय
* रासायनिक फंगिसाइडचा पर्याय
२- वेस्ट डिकंपोजर
* शेतीतील कचरा, अवशेष जलद गतीने विघटन करतो
* मातीतील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढवतो
३- कडुलिंब आधारित जैविक कीटकनाशक
* नैसर्गिक आणि सुरक्षित कीड नियंत्रण
* फळे-भाज्यांवरील अवशेष कमी
४- मातीतील सेंद्रिय कर्ब परीक्षण पद्धत
* शेतकऱ्यांना मातीतील कार्बनचे अचूक परीक्षण करता येणार
* मृदास्वास्थ्य सुधारण्यास मदत
५- ऊती-संवर्धन आधारित केळी प्रोटोकॉल
* दर्जेदार, रोगमुक्त केळी रोपे
* उत्पादन वाढ आणि समसमान वाढ
तंत्रज्ञान हस्तांतरणाचे औपचारिक करार
मुंबई येथील बीएआरसीच्या नाभिकीय कृषी व जैवप्रौद्योगिकी विभागात हा करार झाला.
करारावर स्वाक्षऱ्या बीएआरसीतर्फे डॉ. डॅनियल बाबू, महाबीजतर्फे डॉ. प्रफुल्ल लहाने, महाव्यवस्थापक (गुणनियंत्रण आणि संशोधन) यांनी केल्या.
कार्यक्रमाला बुवनेश्वरी एस. व्यवस्थापकीय संचालिका, महाबीज, डॉ. आनंद बल्लाळ, अध्यक्ष, नाभिकीय कृषी व जैव प्रौद्योगिकी विभाग, बीएआरसी, डॉ. हसन, सहयोगी संचालक, महाबीजचे महाव्यवस्थापक विवेक ठाकरे, विजय देशमुख आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
शेतकऱ्यांसाठी मोठा लाभ
ही अत्याधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांना वाजवी दरात उपलब्ध करून देण्यात येणार असून, यामुळे उत्पादनक्षमतेत आणि उत्पन्नात लक्षणीय वाढ होईल. - बुवनेश्वरी एस.,व्यवस्थापकीय संचालिका , महाबीज
महाबीजची कृती दिशा
* जैविक शेती, ऊती-संवर्धन आणि नव्या वैज्ञानिक तंत्रज्ञानांचा विस्तार
* शेतकऱ्यांना अधिक गुणवत्तापूर्ण उत्पादने उपलब्ध करून देण्यावर भर
आधुनिक शेतीत शाश्वततेचा प्राधान्य
बीएआरसीकडून महाबीजकडे तंत्रज्ञान हस्तांतरण हे महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. जैविक उपाय, सेंद्रिय कार्बन परीक्षण, तसेच रोगमुक्त केळी रोपे यामुळे शेतकऱ्यांना भरघोस लाभ होणार असून, राज्यातील शेती आणखी वैज्ञानिक, सुरक्षित आणि उत्पादनक्षम होण्याचा मार्ग खुला झाला आहे.
