- सुनील चरपे
नागपूर : पीक विम्याच्या दावे मंजुरीसाठी उंबरठा उत्पादन आवश्यक असते. कृषी विभागाने (Krushi Vibhag) सन २०२१-२२ ते २०२४-२५ या तीन वर्षांचे उंबरठा उत्पादन अद्याप काढले नसून, विमा कंपन्यांना (pik Vima Yojana) ही आकडेवारी दिली नाही. त्यामुळे पिकांचे नुकसान हाेऊनही कंपन्यांची पीक विम्याचे दावे मंजूर केले नाही. कंपन्या २५ टक्के अग्रीम संरक्षित रक्कम देऊन शेतकऱ्यांची बाेळवण करीत आहेत.
पीक विमा याेजनेतील प्रति हेक्टरी संरक्षित रक्कम व महत्तम नुकसान भरपाई ही आभासी असते. उंबरठा उत्पादन माहिती झाल्यास शेतकऱ्यांना पीक विमा काढणे सुकर हाेते. शेतकरी संघटना तंत्रज्ञान व कृषी विज्ञान विस्तार आघाडीचे अध्यक्ष मिलींद दामले यांनी माहिती अधिकारांतर्गत कृषी विभागाला याबाबत माहिती मागितली.
तीन वर्षांचे उंबरठा उत्पादन काढले नसून, ती माहिती संकेतस्थळावर अपलाेड केली नाही, असे माहिती अधिकारी तथा कृषी उपसंचालक सुशांत धनवडे यांनी स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे, विमा कंपन्यांच्या फायद्यासाठी शेतकऱ्यांनी या याेजनेत सहभागी व्हावे म्हणून विमा काढण्यापूर्वी उंबरठा उत्पादनाची माहिती शेतकऱ्यांना मुद्दाम दिली जात नाही, असा आराेप केला जात आहे.
याेजनेतील विराेधाभास
सर्व पिकांसाठी जाेखीम स्तर ७० टक्के ठरविण्यात आला आहे. विमा दावे पूर्ण झाल्याशिवाय उंबरठा उत्पादन सांगता येणार नसल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले. नियमानुसार उंबरठा उत्पादनाशिवाय विम्याचे दावे मंजूर करता येत नाही, अशी माहिती विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी दिली. उंबरठा उत्पादन काढण्याची जबाबदारी कृषी विभागावर असली तरी कृषी अधिकारी विमा कंपन्यांकडे बाेट दाखवित आहे.
नुकसान भरपाईचे सूत्र
उंबरठा उत्पादन हे महसूलच्या मंडळनिहाय काढले जाते. विशिष्ट पिकाचे मागील सात वर्षांपैकी पाच वर्षांतील कमाल उत्पादनाची सरासरी काढून त्याला ०.७० या जाेखीम स्तराने गुणले जाते. पीक नुकसान भरपाईची रक्कम ठरविताना उंबरठा उत्पादनातून अपेक्षित उत्पादन वजा करून त्याला विमा संरक्षित रक्कम व २५ टक्के या दाेन आकड्यांनी गुणले जाते. आलेल्या रकमेला उंबरठा उत्पादनाचे भागले जाते.