Agricultural Tradition : चैत्र महिना म्हणजे केवळ नवीन वर्षाची सुरुवात नव्हे, तर बळीराजासाठी कृषी संस्कृतीच्या नव्या अध्यायाचा प्रारंभ आहे. (Agricultural Tradition)
उमरी तालुक्यासह संपूर्ण परिसरात नुकताच 'आंबील बारस' हा पारंपरिक सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. (Agricultural Tradition)
निसर्गपूजा, धार्मिक विधी आणि उन्हाळी शेतीकामांचा श्रीगणेशा अशा त्रिवेणी संगमातून पहाटे जिल्ह्यातील शेतशिवारे गजबजून गेली होती.(Agricultural Tradition)
अनादी काळापासून चालत आलेली परंपरा
'आंबील बारस' हा शेतकऱ्यांचा एक अत्यंत महत्त्वाचा आणि श्रद्धेचा सण मानला जातो. भगवान महादेवाच्या नावाने आंबील तयार करून नैवेद्य दाखवण्याची ही परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आली आहे.
विशेष म्हणजे, या दिवसापासूनच महादेवाच्या यात्रा-उत्सवांना आणि शेतातील उन्हाळी मशागतीच्या कामांना अधिकृतरीत्या सुरुवात केली जाते.
मौन व्रत आणि पहाटेची लगबग
या सणाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे कडक नियम. पहाटे ४ ते ५ वाजेदरम्यान शेतकरी स्नान करून मातीच्या घागरीत आंबील भरतात आणि ती शेतात नेतात.
ही घागर घेऊन शेतात जाताना किंवा परत येताना वाटेत कोणाशीही संवाद साधला जात नाही. हे 'मौन व्रत' पाळत निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची प्रथा आजही ग्रामीण भागात टिकून आहे.
भोकर परिसरातही अनेक शेतकरी कुटुंबांनी पहाटेच आपल्या औताची आणि बळीराजाची पूजा करून हा सण साजरा केला.
आरोग्यदायी आणि चविष्ट 'आंबील'
उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना शरीराला थंडावा देणारे ज्वारी किंवा नाचणीचे आंबील हे आरोग्यासाठी वरदान मानले जाते.
लसूण, जिरे आणि मिरचीचा तडका देऊन तयार केलेले हे आंबट-गोड पेय केवळ नैवेद्य म्हणूनच नव्हे, तर एक लोकप्रिय आरोग्यदायी पेय म्हणूनही ओळखले जाते.
