अकोला : जिल्ह्यात राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान योजना (National Natural Farming Campaign Scheme) राबविण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर नैसर्गिक शेती गट (Natural Farming Group) कार्यान्वित करण्यात येणार आहेत.
प्रत्येक ग्रामपंचायतीतून प्रत्येकी दोन कृषी सखींची (Krishi Sakhi) निवड केली जाईल, जे इच्छुक शेतकऱ्यांचे अर्ज संकलित करून त्यांना नैसर्गिक शेती गटात समाविष्ट करण्याचे काम करतील.
या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी अध्यक्षतेत यांच्या जिल्हास्तरीय सनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातून इच्छुक शेतकऱ्यांना एका एकर क्षेत्रासाठी या अभियानात सहभागी करून घेतले जाईल.
२ कृषी सखींची निवड करण्यात येणार आहे.
या अभियानात सहभागी होण्यासाठी इच्छुक ग्रामपंचायतींनी (Gram Panchayat) त्यांच्या तालुका सनियंत्रण समिती अध्यक्ष व तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे त्यांच्या ग्रामपंचायतीच्या सहमतीचा प्रस्ताव कळवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
अभियानात ग्रा.पं.चा सहभाग महत्त्वाचा
* या कार्यक्रमांमध्ये ग्रामपंचायतींचा सहभाग महत्त्वपूर्ण आहे. या अभियानाची धुरा ग्रामपंचायतींच्या खांद्यावर राहणार आहे.
* त्यामुळे जास्तीत जास्त ग्रामपंचायतींनी या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ही आहेत प्रमुख उद्दिष्टे
* नैसर्गिक पद्धतीवर आधारित स्थानिक पशुधन शेती पद्धती लोकप्रिय करणे, जमिनीचा पोत सुधारणे, बाहेरून निविष्ठा खरेदी कमी करून शेतावरच आवश्यक निविष्ठा निर्मिती करणे व त्याचा वापर वाढवणे, शेतमाल उत्पादनासाठीचा खर्च कमी करणे आणि सहभागी शेतकऱ्यांच्या शेतीचे नैसर्गिक शेती प्रमाणीकरण करणे ही या अभियानाची प्रमुख उद्दिष्टे आहेत.