Join us

परराज्यातून बोगस बियाणे व खतांची घुसखोरी; काय आहे प्रकरण? जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 11:06 IST

तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्यात उत्पादित केलेल्या खते, बियाणांची राज्यात आवक होत आहे. महाराष्ट्रात मान्यता नसलेल्या बियाणांची विक्री केली जात आहे.

सांगली : जिल्ह्याला लागून असलेल्या तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्यात उत्पादित केलेल्या खते, बियाणांची जिल्ह्यात आवक होत आहे. महाराष्ट्रात मान्यता नसलेल्या बियाणांची विक्री केली जात आहे.

विशेष म्हणजे, सोयाबीन, मका, उडीद लागवड क्षेत्र अधिक असल्याने या सीमावर्ती राज्यांतून बियाणे विविध कंपन्यांच्या बोगस नावे दाखल झाले आहेत.

काही स्थानिक व्यापारी अन् अधिकाऱ्यांच्या अर्थपूर्ण व्यवहारातून है बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारले जात आहे. कृषी विभागाकडून मागणी केली, त्याप्रमाणे खते आणि बियाणांचा साठा उपलब्ध होत आहे.

दरम्यान, डीएपीचा तुटवडा असून, येत्या दोन दिवसांत रॅक उपलब्ध होईल, अशी अपेक्षा कृषी विभागाने व्यक्त केली आहे.

परंतु उपलब्ध युरिया, डीएपी, एमओपी, एसएसपी आणि सोयाबीन, मकाच्या विविध बियाणांचा काही व्यापारी जाणीवपूर्वक कृत्रिम तुटवडा निर्माण करून शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहेत.

मागणी असलेली खते, बियाणे उपलब्ध नसल्याचे सांगून बडे व्यापारी शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्या माथी गुजरात, मध्य प्रदेश आणि कर्नाटक, तेलंगणा राज्यांतून आलेले बोगस बियाणे मारत आहेत.

शहरातील काही बडे व्यापारी गुजरात, आंध्र व तेलंगणातील वितरकांशी संगनमत करून बियाणांची नावे व लेबल बदलून तीच बियाणे व खते जिल्ह्यात वेगळ्या नावे विक्री करीत आहेत.

बोगस बियाणांचे रॅकेट सक्रियरित्या चालविणाऱ्या दुकानदारांसह त्यांना मदत करणाऱ्या काही पुढाऱ्यांचा शोध घेण्याचे आव्हान कृषी विभागासमोर आहे.

उगवणशक्ती व उत्पादन क्षमता कमी असलेले बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारले जात आहे. त्यामुळे अशा बोगसगिरीला आळा घालण्यासाठी कृषी विभागाने वेळीच पावले उचलणे गरजेचे आहे.

दर्जाहीन बियाणे शेतकऱ्यांच्या माथीकृषी विभागाच्या रेकॉर्डनुसार जिल्ह्याला लागेल एवढे सोयाबीन, मका, तूर, मूग, उडीद आदी बियाणे आणि विविध प्रकारची खते उपलब्ध आहेत. तसेच मागणी तसा टप्प्याटप्प्याने पुरवठा होत आहे. मात्र, काही व्यापारी शेतकऱ्यांना खते, बियाणे उपलब्ध नसल्याचे सांगत विशिष्ट कंपनीचे बियाणे चांगले आहे, असे भासवून शेतकऱ्यांच्या माथी मारत आहेत, कमी दर्जाची बियाणे शेतकऱ्यांना लादली जात असल्याच्या तक्रारी आहेत.

बियाणे मुबलक; डीएपी खताचा तुटवडाकृषी विभागाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात खरिपासाठी लागणारी खते मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. मका, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, ज्वारी, भुईमूग या पिकांचे बियाणे प्रस्तावित केले, तेवढा पुरवठा केला आहे. त्याचबरोबर सोयाबीन नऊ हजार ८०० क्विंटल, मका आठ हजार ५२० क्विंटल बियाणांची मागणी केली आहे. यापैकी काही बियाणे जिल्ह्यात उपलब्ध झाले आहे, असे कृषी विभागाने सांगितले. पण डीएपी खताचा गेल्या तीन महिन्यांपासून तुटवडा आहे.

तेलंगणासह अन्य राज्यातून बोगस बियाणे, खते येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने सिमा भागामध्ये तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्हा पोलिस प्रमुख, कृषी विभागाचे अधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन सिमा भागातून बोगस ससायनिक खते, बियाणे येणार नाहीत. याची दक्षता घेणार आहे. खरीप हंगामामध्ये एकाही शेतकऱ्यांना बोगस बियाणे, खते मिळू नयेत, यादृष्टीने कृषी विभागाला सूचना दिल्या आहेत. कृषी विभागाच्या पथकाकडूनही तपासणी सुरु आहे. शेतकऱ्यांनीही कुठे बोगसगिरी आढळल्यास कळवावे. - अशोक काकडे, जिल्हाधिकारी, सांगली

अधिक वाचा: राज्यात १ लाख शेतकऱ्यांच्या शेतावर होणार 'एआय'ने ऊस शेती, अनुदानही मिळणार; वाचा सविस्तर

टॅग्स :शेतीशेतकरीपीकसांगलीआंध्र प्रदेशकर्नाटकखतेसरकारजिल्हाधिकारीतेलंगणा