नाशिक : जिल्ह्यात यंदा उन्हाची वाढती तीव्रता आणि गारपिटीमुळे जिल्ह्यातील सर्वदूर कांदा पीक काढणीला शेतकरी वर्गाने सुरुवात केली आहे. ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातील अंतिम टप्प्यातील गव्हाच्या काढणीवर शेतकऱ्यांनी भर दिला आहे.
नाशिक जिल्ह्यात यंदा रब्बी हंगामात नेहमी हवामानात बदल पाहायला मिळाला आहे. मागील वर्षी नऊ महिने जास्त काळ पडलेल्या पावसाने कांदा पिकाचे क्षेत्र मागील वर्षीच्या तुलनेत कमी आहे, तर कांदा पिकाची जागा गव्हाच्या क्षेत्राने घेतल्याने गव्हाचे क्षेत्र यंदा अधिक आहे. मागील आठवड्यात जिल्ह्यातील काही
तालुक्यांत झालेली गारपीट आणि अवकाळीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गान कांदा व गहू काढणीला वेग दिला आहे. जिल्ह्यात यंदा १ लाख ९५ हजार ३८८ हेक्टर क्षेत्रावर कांदा लागवड करण्यात आली होती तर गव्हाचे क्षेत्र ७० हजार २९३ हेक्टर होते. मागील आठवड्यात निफाडसह सिन्नर, दिंडोरी, तालुक्यातील काही भागात अवकाळीचा फटका पाहता गहू काढणीला वेग आला आहे.
आवकेत होतेय वाढ; दरात मात्र घसरण
कांद्याचे उत्पादन घटले असले तरी आवक वाढत असल्याने बाजारात दर कमी होत आहे. कांद्याच्या उत्पादन खर्चामध्ये वाढ झाली असली तरी, मिळणारा दर त्यामानाने कमी असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. परिसरात उन्हाची वाढती तीव्रता यामुळे पीक काढणीला वेग दिला जात आहे.
७००-८०० रुपयांनी दर घसरले
यंदा जिल्ह्यात कृषी विभागाच्या अहवालानुसार ३ लाख १६ हजार मेट्रिक टन उत्पादन अपेक्षित होते. प्रत्यक्षात उत्पादनदेखील वाढले आहे. मात्र वाढत्या उत्पादनामुळे दर मात्र मागील वर्षीच्या तुलनेत ७०० ते ८०० रुपयांनी कोसळलेले आहे.
निफाडसह जवळील सिन्नर व दिंडोरी तालुक्यात अवकाळीने हजेरी लावली. काही ठिकाणी तुरळक प्रमाणात गारादेखील पडल्या आहेत. त्यामुळे शेवटच्या टप्प्यातील गव्हासह कांदा काढणीला सुरुवात केली आहे.
- बबन दराडे, गहू उत्पादक शेतकरी, चापडगाव.
शेतकरी कर्जमाफीविषयी मोठी अपडेट, 'या' शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही, वाचा सविस्तर
