पुणे : केवळ एक हजार रुपये नोंदणी आणि एक हजार रुपयांच्या मुद्रांक शुल्काच्या बदल्यात शेतकऱ्यांना आपल्या शेतजमिनीच्या मालकी हक्काची अदलाबदल करण्यासाठी सुरू केलेल्या सलोखा योजनेत राज्यात एकूण १ हजार ११९ दस्तांची नोंद झाली आहे.
यात शेतकऱ्यांच्या तब्बल १० कोटी ५ लाख रुपयांच्या नोंदणी व मुद्रांक शुल्काची बचत झाली आहे. सर्वाधिक ८४ शेतकऱ्यांची नोंदणी परभणी व बुलढाणा जिल्ह्यात झाली असून, ही योजना ३१ जानेवारीला संपुष्टात आली आहे.
शेतकऱ्यांमधील जमीन विषयक वाद टाळण्यासाठी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने Salokha Yojana ही योजना जानेवारी २०२३ मध्ये अमलात आणली.
यात सहभागी होण्यासाठी पहिल्या शेतकऱ्याच्या शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्याच्या शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे किमान १२ वर्षांपासून असावा, अशी अट घालण्यात आली होती.
या योजनेत सहभागी बाधित शेतकऱ्यांना मुद्रांक शुल्कात सवलत दिली होती. त्यानुसार १ हजार रुपये मुद्रांक शुल्क आणि १ हजार रुपये नोंदणी शुल्क, असे केवळ २ हजार रुपये आकारण्यात आले.
असा मिळाला राज्यातील शेतकऱ्यांना योजनेचा लाभ
१) ही योजना सुरू होऊन गेल्या दोन वर्षांत राज्यात ३१ जानेवारीपर्यंत १ हजार ११९ दस्तांची नोंदणी झाली. त्यानुसार या शेतकऱ्यांना प्रत्येकी २ हजार रुपयांचे शुल्क भरावे लागले.
२) या योजनेमुळे दस्तातील मिळकतीचे बाजारमूल्य लक्षात घेता ८ कोटी ६७ लाख २१ हजार ७९५ रुपयांचे मुद्रांक शुल्क, तसेच १ कोटी ५० लाख ८७ हजार ६०५ रुपयांचे नोंदणी शुल्क, असे एकूण १० कोटी ५ लाख ३० हजार ६०५ रुपये वाचले आहेत.
३) सलोखा योजनेचा लाभ न घेतला असता, तर ३ शेतकऱ्यांना ही रक्कम नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाला भरावी लागली असती.
जिल्हानिहाय झालेली दस्तनोंदणी
अमरावती २६
अकोला २८
बुलढाणा ८४
यवतमाळ ५९
वाशिम ४०
लातूर २५
धाराशिव १३
परभणी ८४
हिंगोली १९
नांदेड ४१
नाशिक ५१
अहिल्यानगर ८३
जळगाव ३३
धुळे १२
ठाणे ग्रामीण ४
पालघर ८
रायगड ११
रत्नागिरी २८
सिंधुदुर्ग ३६
एकूण १,११९
सलोखा योजनेत शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. वर्षानुवर्षे प्रलंबित असलेली दस्त नोंदणी यामुळे मार्गी लागून शेतकऱ्यांचा फायदा झाला. - अशोक पाटील, सहनोंदणी महानिरीक्षक, पुणे
अधिक वाचा: Satbara Durusti : सातबाऱ्यात चूक असेल तर दुरुस्त कशी करायची? वाचा सविस्तर