साहेबराव हिवराळे
छत्रपती संभाजीनगर: शेंद्रा औद्योगिक वसाहत, वाळूज, बिडकीन आणि चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत अनेक कंपन्यांमध्ये विषारी फवारणीमुळे आग्यामोहळ नष्ट होऊन हजारो मधमाशांचा सडा पडत आहे.
पण, यामुळे परागीकरणाचे नैसर्गिक काम थांबून फळपिकाच्या उत्पादनांत घट होत आहे. या मधमाशांमुळे (Honey Bee) शेतातील पिके बहरास येऊन त्यामार्फत नैसर्गिकरीत्या परागीकरणाची प्रक्रिया होते.
परागीकरणाने फळपिकाच्या उत्पादनांत वाढ होते. परंतु, काही कंपन्यांमध्ये आणि नागरी वसाहतीमध्ये सर्रास त्यांच्यावर विषारी द्रावणाने फवारणी करून मारले जाते. यामुळे वातावरणातील संतुलन बिघडून फळे, फुले, शेतीचे मोठे नुकसान होत आहे, हे मानवाने समजून घेतले पाहिजे.
परागीकरणात मधमाशी महत्त्वाचीच
शेतकीदृष्ट्या मधमाशीही महत्त्वाचीच असून, फळपीक अन् फुलावरील परागीकरण, त्याचबरोबर मध मिळविणे असे नित्याचेच काम ती करीत असते. एक माशी जवळपास ७ हजार फुलांच्या संपर्कात येते. ती मारून टाकणे योग्य नाही. ती सुरक्षितपणे हलविण्यासाठी पथके असून, त्यांना कळवावे. - प्रा. भालचंद्र वायकर, मधुमक्षिकापालन तज्ज्ञ
माशा सुरक्षितपणे काढणारा चमू बोलवा असे मोहळ आपल्या घर किंवा कंपनी परिसरात आढळल्यास प्राणी मित्र / ॲनिमल रिस्क्यू सर्विसेस या सेवा देणाऱ्या व्यक्तीकडून सुरक्षितपणे काढून घ्यावे, असे आवाहन वन्यजीव मानद डॉ. किशोर पाठक यांनी केले आहे.
हे ही वाचा सविस्तर : Maharashtra Weather Update : चक्राकार वाऱ्याचा महाराष्ट्रावर काय होणार परिणाम? IMD चा रिपोर्ट वाचा सविस्तर