Join us
Daily Top 2Weekly Top 5

तेंदूपत्ता हंगामाच्या पार्श्वभूमीवर जंगलावर आगीचे संकट; वनविभाग आणि पर्यावरणप्रेमींची चिंता वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 20:07 IST

तेंदूपानांचे संकलन करणे सोपे व्हावे, यासाठी जंगलात काही नागरिकांकडून आग लावली जाते. याच आगीचे रूपांतर पुढे वणव्यात होऊन यात मौल्यवान वनसंपदा जळून मोठ्या प्रमाणात नुकसान होते. हा प्रकार आता दरवर्षीचा झाला आहे.

लवकरच तेंदूपत्ता आणि मोहफुले संकलनाच्या हंगामाला सुरुवात होणार आहे. तेंदूपानांचे संकलन करणे सोपे व्हावे, यासाठी जंगलात काही नागरिकांकडून आग लावली जाते.

याच आगीचे रूपांतर पुढे वणव्यात होऊन यात मौल्यवान वनसंपदा जळून मोठ्या प्रमाणात नुकसान होते. हा प्रकार आता दरवर्षीचा झाला आहे. तेंदूपत्ता हंगामाच्या पार्श्वभूमीवर जंगलावर आगीचे संकट वाढल्याने वन, वन्यजीव विभाग आणि पर्यावरणप्रेमींची चिंता वाढली आहे.

उन्हाळ्यात झाडांची पाने गळून पडल्याने जंगलातील जमीन कोरड्या पानांच्या थराने झाकली जाते. या कोरड्या पानांमुळे आग वेगाने पसरते. तेंदूपत्ता तोडणीच्या काळात काही ठिकाणी झाडाखालील पाने साफ करण्यासाठी आग लावली जाते. तर अनेक कामगार जंगलात काम करताना धूम्रपान करतात व जळत्या विड्या किंवा काड्या फेकल्यानेही आग लागण्याची शक्यता वाढते.

उन्हाळ्यात जंगलातील नैसर्गिक पाणवठे कोरडे पडत असल्याने आग विझविण्याचे काम वन कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत कठीण होते. वनविभागाकडून जंगलातील आगीचा प्रसार रोखण्यासाठी 'अग्निशमन रेषा' (फायर लाईन) तयार केल्या जातात. जमिनीवर ठरावीक अंतरावर माती खोदून अरुंद पट्टा तयार केला जातो.

ज्यामुळे आग एका मर्यादेपलीकडे पसरू शकत नाही. मात्र, अनेक ठिकाणी साधनसामग्री व मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे या उपाययोजना अपुऱ्या पडत असल्याची टीका केली जात आहे. अनेकदा वन कर्मचारी हातात झाडांच्या फांद्या घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न करतात.

जंगलातील गस्त वाढविण्याची गरज

या पार्श्वभूमीवर वनविभागाने गस्त वाढवून जंगलांवर लक्ष ठेवणे तसेच आगीच्या घटनांमागील कारणांचा शोथ घेऊन दोर्षीवर कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याची मागणी पर्यावरणप्रेमींकडून होत आहे. वाढते तापमान आणि वेगवान वारे लक्षात घेता येत्या काही आठवड्यांत जंगलांमध्ये आगीचा धोका अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

वन्यप्राणीही संकटात

• या घटनांमुळे मोठ्या प्रमाणावर वनसंपत्तीचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

• शिवाय जंगलातील आगीमुळे केवळ झाडेच नव्हे तर हरीण, रानडुक्कर, ससे, पक्षी आणि इतर वन्यजीवांचे अधिवासही धोक्यात येतात.

• मोहफुले व तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी जंगलात मोठ्या प्रमाणावर गावकऱ्यांची वर्दळ वाढत असल्याने वन्यजीवांनाही त्रास सहन करावा लागत आहे.

नवेगाव-नागझिरा परिसरातही आगीच्या घटना

• मार्च २०२६ महिन्यात गोंदिया जिल्ह्यातील अनेक वनक्षेत्रांमध्ये आगीच्या घटना घडल्या असल्याची माहिती नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे उपवनसंरक्षक रिजवी यांनी दिली.

• त्यांच्या माहितीनुसार नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प अंतर्गत बोंडे वनक्षेत्रातील पिंडकेपार, गोंदिया बफर क्षेत्र, दक्षिण देवरी वनपरिक्षेत्रातील कन्हळगाव आणि जेठभावडा, तसेच उत्तर देवरी वनक्षेत्रातील चिचेवाडा येथे आग लागल्याच्या घटना नोंदविण्यात आल्या आहेत.

• याशिवाय गोंदिया विभागातील आमगाव वनपरिक्षेत्रातील अंगोरा क्षेत्रातील बघेडा वनक्षेत्र तसेच पश्चिम देवरी वनविभागातील मुल्ला वन क्षेत्रातील वडेगाव आणि डोंगरगाव परिसरातही आगीच्या घटना घडल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा : शिंगाडा प्रक्रिया उद्योग : बेरोजगार तरुण, महिला तथा शेतकऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी

English
हिंदी सारांश
Web Title : Forest fires surge during tendu leaf season, raising concerns.

Web Summary : Forest fires are escalating due to tendu leaf collection practices. This destroys valuable resources, threatening wildlife. Inadequate resources hinder fire control efforts. Increased patrolling and strict action are needed.
टॅग्स :विदर्भशेती क्षेत्रशेतकरीशेतीजंगलवनविभाग