सोलापूर : पाणी वाढेल.. पूर येईलही, मात्र गाव पाण्यात जाईल असे वाटले नाही. यंदा असे चित्र पाहायला मिळाले. साधारण १५ दिवसांच्या सीनेच्या महापुराने शेतीची विस्कटलेली घडी सव्वादोन महिन्यांनंतरही बसली नाही. नदीकाठच्या शेतीचा वीज पुरवठा आजही सुरू झालेला नाही. कोणाला तुटपुंजी पीक नुकसान भरपाई मिळाली, तर कोणी मायबाप सरकार आज नाही तर उद्या पैसे देईल या आशेवर पाकणीकर आहेत.
यंदा जिल्ह्यात व शेजारच्या जिल्ह्यात असा काय पाऊस पडला की शेतीचे मोठे नुकसान करून गेला. आजवर कोणी पाहिले नाही इतके पाणी नाले, ओढे व नद्यांतून वाहिले. पाऊस बंद होऊन महिना उलटला तरी आजही ओढे व नदीचा प्रवाह सुरू आहे. पडलेल्या पावसाने व आलेल्या महापुराने शेतकऱ्यांची अन् शेतीची घडी विस्कटली आहे. ती पूर ओसरल्यानंतर सव्वादोन महिन्यांनंतरही बसली नाही.
उत्तर तालुक्यातील पाकणी असेच एक सीना नदीकाठालगत गाव. पाकणी येथील सीनेच्या पात्राबाहेर पाणी १५ सप्टेंबरला बाहेर पडले ते पंधरा दिवस शेतात राहिले. या कालावधीत शेतीपिकांचे नुकसान तर झालेच शिवाय त्यावेळी बंद झालेला शेती पंपाचा वीज पुरवठा आजही सव्वादोन महिन्यांनंतरही सुरू झाला नाही. पिके तर गेलीच शिवाय मातीही खरडून गेली; मात्र नुकसान भरपाई मिळाली नाही.
महापुराचे पाणी ४०२ घरात शिरले होते
महापुराचे पाणी ४०२ घरात शिरल्याचे पंचनामे प्रशासनाने दिले होते. पाकणीतील २० घरांची पडझड झाल्याचे फॉर्म भरून दिले, मात्र त्याची रक्कम मिळाली नाही. भीमराव यलगुंडे, रंजना अभिमन्यू पाटील, सत्यवान शंकर भोसले, लक्ष्मण मुरारी शिंदे, नरहरी शंकर साठे, पांडुरंग शंकर साठे, बालाजी यादव, दिनकर यादव, हणमंत यादव असे आणखीन काही शेतकऱ्यांच्या सीना काठच्या शेतीचे व घरांचे मोठे नुकसान झाले. उसासारखे पीक पालथे झाले, उसाला पाला व वाढे राहिले नाही शिवाय उसावर गाळ, चिकारीची झाडे येऊन बसली. सोयाबीन, कांदा व इतर पिके तर बघायलाही राहिली नाहीत.
नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
नरहरी व पांडुरंग साठे यांची घरे नदीकाठापासून अकराशे फूट लांब पाकणी-शिवणी रस्त्यालगत आहेत. या घरात आठवडाभर पाणी होते. दोघा भावांकडे शेतीला जोडून दूध व्यवसाय आहे. गाई, म्हशी आहेत. नदीकाठालगतचे घास गवत खराब झाले. २० बॅग पशुखाद्य, २० बॅग रासायनिक खत भिजून वाया गेले. मुरघास, कडबा वैरण वाहून गेले. पुरामुळे ६० ते ७० पोल आडवे झाले. २५ पोल उभारले, २० पोल आलेत मात्र उभारले नाहीत.
नदीकाठालगतच्या आठ ट्रान्स्फॉर्मरवरील ३ शेतीचा वीज पुरवठा सुरू झाला नाही. जनावरांसाठी गावडीदारफळवरून दीड हजार पेढ्या कडबा आणला होता. पावसाळा व हिवाळ्यात जनावरांच्या वैरणीसाठी सहाशे पेंड्या ठेवला होता तो वाहून गेल्याचे दिनकर यादव यांनी सांगितले. नदीकाठालगतच्या शेतकऱ्यांची जनावरे आहेत, मात्र पुरामुळे हिरवा चारा राहिला नाही व वीज पुरवठा बंद असल्याने हिरवा चारा नव्याने करता येत नसल्याचे प्रशांत पाटील यांनी सांगितले. सीना नदीवरील पाकणी बंधाऱ्याखाली महापुराने नदीचे पात्र बदलल्याने जमीन खरडून शेती वाहून गेली. आता बदललेल्या पात्रातून पाणी वाहत आहे. जर पुन्हा के नदीला पूर आला तर बदललेल्या पात्रामुळे शेतीचे मोठे नुकसान होणार असल्याचे ढंगळे यांनी सांगितले.
