पुणे : राज्यात येणाऱ्या खरीप हंगामाची तयारी सुरू झाली असून शेतकऱ्यांनी यंदाच्या हंगामातील दुष्काळाच्या झळा भरून काढण्यासाठी कंबर कसली आहे. या मान्सूनमध्ये हवामान विभागाने १०६ टक्के पावसाचा अंदाज वर्तवल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंद असून शेतकऱ्यांनी खरिपासाठी आत्तापर्यंत १ लाख १९ हजार मेट्रीक टन खतांची खरेदी केली आहे.
दरम्यान, यंदा राज्यात अपेक्षित खतांचा साठा असल्यामुळे शेतकऱ्यांना खतासाठी वणवण करावी लागणार नाही अशी शक्यता आहे. तर राज्य सरकारने दिलेल्या ४८ लाख मेट्रीक टनाच्या प्रस्तावातील ४५ लाख ५३ हजार मेट्रीक टन खताला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. तर सध्या राज्याकडे २६ लाख ७० हजार मेट्रीक टन खतांचा साठा शिल्लक आहे.
कृषी विभागाच्या माहितीनुसार खरीप हंगाम २०२४ साठी २ लाख ३६ हजार मेट्रीक टन खतांचा पुरवठा करण्यात आला आहे. त्यामुळे यंदा सरासरीपेक्षा जास्त खते राज्यासाठी उपलब्ध आहेत. त्यातच खरिपासाठी राज्यात आत्तापर्यंत (१९ एप्रिल अखेरच्या आकडेवारीनुसार) १ लाख १९ हजार मेट्रीक टन खते शेतकऱ्यांनी खरेदी केली आहेत.
कोणत्या खतांची शेतकऱ्यांनी केली खरेदी?
- युरिया - ५५ हजार मेट्रीक टन
- डीएपी - ९ हजार मेट्रीक टन
- एमओपी - ४ हजार मेट्रीक टन
- संयुक्त खते - ३९ हजार मेट्रीक टन
- एसएसपी - ११ हजार मेट्रीक टन