रेशीम उद्योग हा ग्रामीण भागातील स्वावलंबनासाठी अत्यंत उपयुक्त पर्याय असून विशेषतः महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यात हा व्यवसाय मदत करू शकतो. मागील वर्षात अहिल्यानगर जिल्ह्यात ६६८ शेतकऱ्यांनी ३१६ हेक्टर क्षेत्रावर तुतीची लागवड करून २ लाख ६५ हजार अंडीपुंज व १५१ मेट्रिक टन कोषाचे उत्पादन घेतले आहे.
गतवर्षात रेशीम शेतीसाठी १०२ शेतकऱ्यांना ८५ लाख ४४ हजार रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा रेशीम विकास अधिकारी संदीप आगवणे यांनी दिली.
कमी पाण्यातही तुती जगत असल्यामुळे उन्ह्याळ्यात अथवा दुष्काळात दोन महिने पाणी नसतानाही बागा पून्हा उगवून येते. कीड व रोग नैसर्गिक आपत्ती जसे अवकाळी पाऊस, गारपिटीपासून बागेस विशेष नुकसान होत नाही.
इतर बागायती पिकांच्यातुलनेत तुतीच्या झाडांना पाणी कमी लागते. संगोपनातील कचरा, काड्या, अळ्यांची विष्ठा, खाऊन राहिलेला पाला हे कुजवून चांगले खत तयार होते व हा काडीकचरा गांडुळास दिल्यास अतिशय चांगल्या प्रकारे गांडूळ खत या पासून मिळते.
केंद्र पुरस्कृत सिल्क समग्र-२ योजनेंतर्गत एक एकर व दोन एकर शेती असलेल्या रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना लाभ देण्यात येतो. यामध्ये तुती लागवड, ठिबक सिंचन, रेशीम कीटक संगोपनगृह, रेशीम संगोपन साहित्य, निर्जंतुकीकरण यासाठी एक एकर शेती असलेल्या सर्वसाधारण गटातील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना ३ लाख ७५ हजार रुपये लाभ देण्यात येतो.
तर अनुसूचित जाती व जमातीच्या शेतकऱ्यांना ४ लाख ५० हजार रुपये तर दोन एकर शेती असलेल्या सर्वसाधारण गटातील शेतकऱ्याला ५ लाख ६५ हजार ५०० तर अनुसूचित जाती व जमातीच्या शेतकऱ्यांना ६ लाख ७५ हजार रुपयांचा लाभ देण्यात येतो.
रेशीम कोष विक्रीसाठी जालना, बीड व बारामती येथे चांगली बाजारपेठ आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांचे कोष लिलाव पद्धतीने खरेदी व विक्री केले जातात.
भांडवलासाठी बँकेकडून अर्थसाहाय्य
रेशीम उद्योगासाठी प्रकल्प मूल्य ६ लाख ५२ हजार ५१५ इतके निश्चित केले असून त्यापैकी २० टक्के रक्कम बँकेकडून कर्ज स्वरूपात उपलब्ध होते. याशिवाय जिल्हा सहकारी बँकेमार्फत तुती लागवड व्यवस्थापन व संगोपन खर्चासाठी कमाल १ लाख ८५ हजार रुपये पीककर्ज उपलब्ध होणार आहे.
तुती रेशीम उद्योगाचे फायदे
एकदा तुती लागवड केली की १२ ते १५ वर्ष लागवडीचा खर्च येत नाही. तसेच एकदा कीटक संगोपन गृह बांधले व साहित्य खरेदी केली की पुन्हा खर्च येत नाही. तुती रोपांची लागवड केल्यापासून ३ ते ४ महिन्यांत तुती बाग कीटक संगोपनासाठी योग्य होते.
अल्प भूधारक शेतकऱ्यांना उपयुक्त
रेशीम अळ्यांचे योग्य संगोपन, अळ्यांना पुरेशी जागा व पोषक खाद्य दिल्याने १०० अंडीपुंजाला कमीत कमी ६० किलो कोष उत्पादन होते. कोषांपासून धागा काढून त्यापासून कापड तयार करणे हा मुख्य भाग असला तरीही याशिवाय कमी प्रतीच्या कोषापासून फुले, बुके, हार, तोरण, वॉल पिस या बाबी तयार करता येतात. अल्प व अत्यल्प भूधारक शेतक-यांसाठी अतिशय चांगल्या व्यवसाय आहे.