नाशिक : जिल्ह्यातील ७० टक्के शेतकऱ्यांनी फार्मर आयडी (Farmer ID) (डिजीटल कार्ड) काढले नसल्याची बाब उघड झाल्यानंतर त्याची कारणे शोधण्यासाठी कृषी विभागाला आता कुठे जाग आली आहे. जिल्ह्यातील १३ लाख ७८ हजार २३० शेतकऱ्यांपैकी जवळपास चार लाख शेतकऱ्यांनी आधार कार्डला मोबाइल नंबर लिंक केला नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
४५ टक्के शेतकऱ्यांनी आधार कार्ड अपडेट (Aadhar card Update) देखील केलेले नाही. त्यामुळे फार्मर आयडीसाठी शेतकरी सेतू केंद्र अथवा जवळच्या कृषी कार्यालयात जात असले, तरी त्यांना माघारी फिरावे लागत आहे. त्यामुळे फार्मर आयडीसाठी शेतकऱ्यांची अनास्था व अपटेट नसणे हे देखील महत्त्वाचे कारण आहे. जिल्ह्यात फार्मर आयडीसाठी नोंदणीला (Farmer ID Registration) दुसऱ्या टप्प्यात मुदत वाढवून देखील केवळ ३०.४० टक्के शेतकऱ्यांनीच फार्मर आयडी काढले आहे.
सर्व्हर डाउनची बाधा (Server Down) नोंदणीसाठी झाली असल्याचे निदर्शनास आले होते. आता साडेचार लाख शेतकऱ्यांचे आधार मोबाइलशी लिंक नसल्याचे उघड झाल्याने शासनाने अनेक प्रयत्न करूनही फार्मर आयडीचे त्रांगडेच आहे. फार्मर आयडी काढल्याशिवाय कृषी योजनांचा लाभ मिळणार नाही, त्यामुळे फार्मर आयडी असणे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे आहे.
ग्रामीण स्तरावर तालुका कृषी अधिकारी यांनीही अनेकदा सेतू केंद्रांना भेटी दिल्या. शेतकऱ्यांना वारंवार त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून फार्मर आयडीचे फायदे व तोटे स्मरणात आणून दिले, परंतु तरीही शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद मिळत असल्यामुळे कृषि विभागाच्या चिंतेत भर पडली आहे.
तांत्रिक अडचणीदेखील असल्याने शेतकऱ्यांना त्रास
शेतकरी डिजिटल आयडी हे एक १२ अंकांचे एक खास ओळखपत्र आहे. हे ओळखपत्र प्रत्येक शेतकऱ्याला देण्यात येणार आहे. आयडी शेतकऱ्यांसाठी एक डिजिटल आयडी कार्ड म्हणून वापरता येईल. जमिनीच्या नोंदीत तफावत असणे वैगेरे तांत्रिक अडचणी देखील फार्मर आयडी बनविताना येत असल्याचे दिसते. बऱ्याचशा शेतकऱ्यांकडे सातबाऱ्याची नोंद नसणे हे देखील समोर येत आहे. तांत्रिक अडचणी दूर झाल्याशिवाय फार्मर आयडी शेतकऱ्यांना मिळणार नाही. यासंदर्भात शासनाच्या वतीने स्पष्टपणे सूचना करण्यात आल्या आहेत.
फार्मर आयडी काढून देण्यासाठी शेतकऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन कृषी विभागाने आम्हाला केले होते. त्यासाठी आम्ही नियमित कामकाजावर परिणाम होऊ नये, यासाठी नोंदणीकरिता स्वतंत्र व्यवस्था केली. परंतु, अनेक शेतकऱ्यांनी त्यांचे आधार कार्ड मोबाइलशी लिंक केलेले नसल्याने तसेच माहिती चुकीची भरली जात असल्याने अडचण येत आहे. सिद्ध पिंप्रीत केवळ ३० ते ३५ टक्के शेतकऱ्यांनी फार्मर आयडी बनवले आहे. हीच गत इतर गावांचीही आहे. त्यातच सर्व्हर डाउनची समस्या आहेच. पुढच्या दहा ते पंधरा दिवसात आयडी क्रमांक वाढण्याचा अंदाज आहे.
- मोहित पिंपरे, सायबर कॅफे चालक, सिद्ध पिंप्री