बैलजोडीधारकांनी एकी करून दोन हजार रुपये भाडेवाढ केल्याची केल्याची दवंडी २२ रोजी पवनार (जि. वर्धा) गावातून फिरविण्यात आली. ज्यांच्याकडे बैलजोडी नाही अशा शेतकऱ्यांचे मात्र यामुळे चांगलेच धाबे दणाणले आहे.
आजपर्यंत १२०० ते १५०० रुपये एका दिवसाच्या जोडीचे भाडे आकारले जायचे. मात्र, अचानक ही मोठी वाढ केल्याने शेतकरी पुरता घाबरला आहे. जून महिन्याचा तिसरा आठवडाही संपत आला असूनही पाहिजे तसा पाऊस न आल्याने शेतकरी संकटात आहे.
दुबार पेरणीकडे वळत आहे. तर मे महिन्यात झालेल्या पावसाने काहींची शेतं आधीच हिरवीगार असल्याने त्यांना पुन्हा मशागत करणे गरजेचे आहे. मात्र बैलजोडीचे वाढलेले दर शेतकऱ्यांचे कंबरडे मोडल्याशिवाय राहणार नाही, हे तितकेच खरे.
मजुरांची मजुरीही वाढल्याने शेतकऱ्यांचे बजेटही वाढले
महिला मजुराच्या मजुरीतही पन्नास ते शंभर रुपयांची वाढ झाली आहे. परिणामी, मजूर मिळणे दुरापास्त झाले आहे. यामुळे शेतीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढत असून त्यामानाने उत्पादन कमी असल्यामुळे शेती पडीक राहण्याची भीती निर्माण झाली आहे.
खर्च वाढता, उत्पादन कमी
रासायनिक खते व बी बियाणे यामध्येही सुमारे ३० टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. मात्र, तीन वर्षांपासून शेतमालाच्या भावात घसरण निर्माण झाली आहे. शेतीचा वाढता खर्च व उत्पादन मिळकत कमी यामुळे थकीत कर्जदारांची आकडेवारी देखील फुगत चालली आहे.
शेतकऱ्यांची चारही बाजूने कोंडी होत आहे. जोडीधारकांनी वाढविलेले दर हे आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे आता शून्य मशागत शेतीवर भर द्यावी लागणार आहे. हा दर एकही शेतकऱ्याला मान्य नसल्याने शेतकऱ्यांनी सुद्धा आपले संघटन तयार करून बाराशेच्यावर दर देणार नाही, अशी भूमिका घेणे गरजेचे आहे. - अनुप चंदनखेडे, शेतकरी.