Join us

आरआरसीची कारवाई झाल्यानंतर कारखान्यांची चुकती केली थकबाकी; भैरवनाथ, भीमाशंकरने केला हिशेब चुकता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 15:27 IST

शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे थकविल्याने साखर आयुक्तांनी आरआरसी कारवाई केलेल्या भैरवनाथ आलेगाव, भैरवनाथ लवंगी व भीमाशंकर या साखर कारखान्यांची थकबाकी चुकती केली आहे.

शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे थकविल्याने साखर आयुक्तांनी आरआरसी कारवाई केलेल्या भैरवनाथ आलेगाव, भैरवनाथ लवंगी व भीमाशंकर या साखर कारखान्यांची थकबाकी चुकती केली आहे.

शेतकऱ्यांनी वर्षभर स्वतः खर्च केलेला ऊस कारखानदार घेऊन गेले मात्र पैसे देण्यास तयार नाहीत. आजही सोलापूर जिल्हातील नऊ साखर कारखान्यांकडे १०१ कोटी अडकले आहेत.

मे अखेरला जिल्ह्यातील साखर कारखानदारांकडे १३४ कोटी ४२ लाख रुपये अडकले होते. ऊस उत्पादक शेतकरी उसाच्या पैशासाठी हेलपाटे घालून वैतागले आहेत.

मात्र बरेच कारखानदार शेतकऱ्यांची अडचण समजून घेण्यास तयार नाहीत. ३१ मे ते १५ जूनपर्यंत काही कारखानदारांनी २९ कोटी रुपये दिले तर १५ जून रोजी १०५ कोटी १२ लाख रुपये कारखानदार देणे आहे.

१५ जूननंतर भैरवनाथ शुगर आलेगावने थकीत २८० लाख, भैरवनाथ शुगर लवंगीने १२८ लाख रुपये तर भीमाशंकर शुगर वाशी धाराशिवने २३७ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले असल्याचे सोलापूर प्रादेशिक सहसंचालक प्रकाश आष्टेकर यांनी सांगितले. या तीनही साखर कारखान्यांवर साखर आयुक्तांनी आरआरसी कारवाई केली आहे.

वेळच्या वेळी पैसे जमा होतील असे सांगितल्याने गोकुळ शुगरला ऊस घातला. मात्र पैसे जमा करण्याचे वायद्यावर वायदे केले जात आहेत तरी पैसे जमा होत नाहीत. कारखान्याचे जबाबदार कोणीही फोन घेत नाहीत. अगोदर ऊस जोपासण्यासाठी खर्च करायचा व ऊस तोडणी झाल्यानंतर पैशासाठी कारखानदाराकडे हेलपाटे घालावे लागत आहेत. - एक ऊस उत्पादक.

तरीही १०१ कोटी थकीतच..

• सोलापूर जिल्हातील ९ (गोकुळ, जयहिंद, सिद्धेश्वर, सिद्धनाथ, मातोश्री लक्ष्मी शुगर, भीमा, इंद्रेश्वर, सहकार शिरोमणी वसंतराव काळे व श्री. पांडुरंग श्रीपूर).

• २ साखर कारखान्यांनी अद्यापही १०१ कोटी रुपये थकविले आहेत. यातील इंद्रेश्वर साखर कारखाना शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करीत असून चार दिवसांत पाच कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार असल्याचे साखर सहसंचालक कार्यालयाकडून सांगण्यात आले.

• मात्र अध्यापही जिल्ह्यातील थकबाकी असलेले इतर साखर कारखानदार शेतकऱ्यांचे पैसे कधी देणार, हा प्रश्न आहे.

हेही वाचा : शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध; सौर कृषिपंपांच्या समस्यांसाठी आता फोनद्वारे किंवा ऑनलाइन तक्रार करता येणार

टॅग्स :साखर कारखानेऊसशेतकरीशेती क्षेत्रसोलापूरसरकार