वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, खामगाव येथे ३ जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विस्तार शिक्षण संचालनालय वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी, कृषि विज्ञान केंद्र, खामगाव, कृषी विभाग, आत्मा, महिला आर्थिक विकास महामंडळ, उमेद, इफको व धान फाउंडेशन, बीड यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठस्तरीय भव्य महिलाशेतकरी मेळावा उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस केव्हीके खामगाव येथे डॉ पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत गाय गोठा शेड चे उद्घाटन करण्यात आले. तसेच येथे आयोजित कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. गिरधारी वाघमारे यांनी कार्यक्रमाचा उद्देश सांगितला तसेच विस्तार शिक्षण संचालनालय व कृषि विज्ञान केंद्राच्या वतीने शेतकऱ्यांसाठी चालणाऱ्या उपक्रमांची सविस्तर माहिती देण्यात आली.
शेतीपूरक व्यवसायांमध्ये उत्तुंग भरारी घेतलेल्या शेतकरी महिलांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. प्रातिनिधिक स्वरूपात गायीच्या शेणापासून विविध वस्तू तयार करणाऱ्या उमा औटी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून यशस्वी उद्योजिका महिला सिताबाई मोहिते, जिजामाता कृषि भूषण पुरस्कार प्राप्त, रामनगर, जालना यांनी त्यांच्या अनुभवाच्या कथनातून महिलांना प्रेरीत केले.
मोहिते यांनी सांगितले की, महिला या जन्मतः सक्षम असतात फक्त त्यांची त्यांना जाणीव करून घेण्याकरिता विद्यापीठाच्या सहकार्याची गरज असते. उद्योगामध्ये भरारी घेण्यासाठी सातत्य, चिकाटी, मालाची गुणवत्ता टिकवणे महत्त्वाचे असते. त्यांनी महिलांना बाजारपेठेत आपला माल विकण्यासंदर्भात विविध प्रकारचे उदाहरणे सांगितले.
तांत्रिक सत्रात महिलांचे काबाड कष्ट कमी करण्यासंदर्भात प्रात्यक्षिकासह विद्यापीठाने विकसित केलेले तंत्रज्ञानाविषयी डॉ. नीता गायकवाड, केंद्र समन्वयक तथा वरिष्ठ शास्त्रज्ञ, अ.भा.स.सं.प्र कृषीरत्न महिला, वनामकृवी परभणी यांनी या बाबतीत सखोल मार्गदर्शन केले.
माविम चे जिल्हा समन्वय अधिकारी सुखदेव चिंचोलीकर यांनी महिला बचत गटाच्या आर्थिक उन्नतीसाठी ५९ लाखाच्या चेक द्वारे मान्यवरांच्या हस्ते महिला बचत गटांना देण्यात आले. डॉ. शिवाजी पवार यांनी नॅनो युरिया चे महत्व सांगून उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय समारोपात विद्यापीठाचे कुलगुरू मा प्रा डॉ. इन्द्र मणि यांनी आर्थिक उन्नती झाल्याशिवाय महिला सक्षमीकरण होणे अशक्य असल्याचे मत व्यक्त केले. महिला सक्षमीकरण करावयाचे झाले तर महिलांकडे निर्णय प्रधानता, आर्थिक बळ या बाबी महत्वाच्या आहेत. मोठया संख्येने उपस्थित महिलांचे अभिनंदन व कौतुक कुलगुरु यांनी केले.
विद्यापीठस्तरीय महिला शेतकरी मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी वनामकृवी परभणीचे मा. कुलगुरू प्रा.डॉ. इन्द्र मणि होते. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ. गिरधारी वाघमारे, संचालक विस्तार शिक्षण वनामकृवी, परभणी हे लाभले होते.
सुभाष साळवे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बीड, सयप्पा गरंडे, कृषि विकास अधिकारी बीड, सुखदेव चिंचोलीकर, जिल्हा समन्वय अधिकारी, माविम, बीड, मुरहरी सावंत, ईफको चे जिल्हा प्रतिनिधी सय्यद, डॉ. पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
आभार प्रदर्शन केव्हीकेच्या कार्यक्रम समन्वयक डॉ. दिप्ती पाटगावकर यांनी केले तर सूत्रसंचालन विषय विशेषज्ञ डॉ. हनुमान गरुड यांनी केले, सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख व केव्हीके मधील शास्त्रज्ञ डॉ. किशोर जगताप, डॉ. श्रीकृष्ण झगडे, डॉ. तुकेश सुरपाम, दत्तप्रसाद वीर, विजय चांदणे, सुधाकर काटे, उमेश वारे यांनी परिश्रम घेतले. तर महिला आर्थिक विकास महामंडळ गेवराई येथील उषा राठोड व त्यांची संपूर्ण टीमने खूप परिश्रम घेतले.