नागभीड : पीक कर्जासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करताना आर्थिक संकटात असलेल्या बळीराजाला चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मोठा दिलासा दिला आहे.
बँकेने ५०० रुपयांच्या मुद्रांकाची जाचक अट रद्द केली असून, आता केवळ १०० रुपयांच्या मुद्रांकावरील शपथपत्रावर पीककर्ज देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील सुमारे ९७ हजार शेतकऱ्यांचे ४ कोटी रुपये वाचणार आहेत.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून दरवर्षी सेवा सहकारी व आदिवासी विविध कार्यकारी संस्थांमार्फत हजारो शेतकऱ्यांना अल्प मुदतीचे पीक कर्ज दिले जाते. मात्र, ज्या शेतकऱ्यांचा सातबारा संयुक्त आहे, त्यांना इतर खातेदारांची संमती घेणे बंधनकारक होते.
त्यासाठी ५०० रुपयांच्या मुद्रांकाची अट घालण्यात आली होती. अतिवृष्टी, दुष्काळ आणि बाजार भावातील घसरणीमुळे आधीच खचलेल्या शेतकऱ्यांसाठी हा ५०० रुपयांचा खर्च म्हणजे अतिरिक्त आर्थिक बोजा ठरत होता.
३१ मार्चपर्यंत कर्जाची परतफेड करूनही नव्या हंगामासाठी पुन्हा मोठा खर्च करावा लागत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर होता. शेतकऱ्यांची ही अडचण लक्षात घेता, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक गणेश तर्वेकर यांनी बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांच्याकडे ही अट शिथिल करण्याची मागणी केली होती. ५०० रुपयांऐवजी १०० रुपयांच्या मुद्रांकावरील संमतीपत्र स्वीकारून पीक कर्ज वितरित करावे, अशी विनंती त्यांनी लावून धरली होती. या मागणीचा बँकेने सहानुभूतीपूर्वक विचार करून शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला आहे.
ज्या शेतकऱ्यांच्या सातबारावर एकापेक्षा अधिक नावे आहेत, त्यांना ५०० रुपयांच्या मुद्रांकाची अट होती. ही बाब लक्षात येताच ती अट रद्द करण्याची मागणी बँकेकडे केली. बँकेने ती मान्य केली असून, आता १०० रुपयांच्या मुद्रांकावरच कर्ज उपलब्ध होत आहे.
- गणेश तर्वेकर, संचालक, जि.म.स. बैंक, नागभीड
