Join us

नुकसानग्रस्त पिकाच्या पंचनाम्यास केलेला विलंब भोवला; कृषी सहायक, अधिकारी, ग्रामसेवकांना तहसीलदारांनी पाठवली नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 10:13 IST

अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. मात्र एक महिना होऊन देखील नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्यात आलेले नाहीत. यामुळे संबंधित गावांच्या कृषी सहायक, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामसेवक यांच्यासह ग्रामविकास अधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

जालना जिल्ह्याच्या बदनापूर तालुक्यातील १८ गावांमध्ये अवकाळी पाऊस झाला होता. यामध्ये शेती आणि शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.

मात्र एक महिना होऊन देखील नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्यात आलेले नाहीत. यामुळे संबंधित गावांच्या कृषी सहायक, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामसेवक यांच्यासह ग्रामविकास अधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

तालुक्यातील काही गावांमध्ये ५ मे ७मे दरम्यान अवकाळी पाऊस, गारपीट व वादळी वाऱ्यामुळे फळबाग व इतर शेती पिकांचे ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेले होते.

अशा ठिकाणचे प्रथम प्राधान्याने प्रत्यक्ष मोक्यावर जाऊन ग्राम महसूल अधिकारी, कृषी सहायक, ग्रामसेवक - ग्रामविकास अधिकारी यांच्या पथकाचे संयुक्त पंचनामे करण्यासंदर्भात तहसीलदार यांनी आदेश दिले होते.

परंतु, संबंधित अधिकारी यांनी केवळ शेतकरी संख्या व क्षेत्र कळविलेले होते. त्यानंतर एक महिन्यानंतरसुद्धा परिपूर्ण पंचनामे व अहवाल सादर न केल्याने प्रभारी तहसीलदार हेमंत तायडे यांनी संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजावली.

१७ जूनपर्यंत अहवाल द्या

• यामध्ये म्हटले आहे की, शेती पीकनिहाय परिपूर्ण पंचनामे सादर केलेले नाही. तसेच उपविभागीय अधिकारी यांनी सोमवारी १६ जून रोजी घेतलेल्या व्हीसीमध्ये तत्काळ पंचनामे जमा करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार या कार्यालयाकडून पंचनामे व अहवाल विना विलंब १७ जूनपर्यंत प्रत्यक्ष तहसील कार्यालयात सादर करण्याबाबत कळविण्यात आले होते.

• वरिष्ठांकडून सूचना देऊनदेखील मरगळलेल्या कर्मचारी यांनी नैसर्गिक आपत्तीसारख्या विषयाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याच्या कारणावरून त्यांना नोटीस पाठवून २४ तासांच्या आत पंचनामे सादर करण्यामध्ये का विलंब झाला याचा खुलासा करावा असे निर्देश दिले.

• नुकसानीची टक्केवारी ३३ टक्केपेक्षा कमी असेल, प्राथमिक अहवाल कळविला. तीन दिवसांत समक्ष पाहणी करून तत्काळ संयुक्त स्वाक्षरीचा अहवाल का सादर केले नाही याचादेखील खुलासा सादर करावा, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

'या' गावात आतापर्यंत झाले नाहीत पंचनामे

सोमठाणा, राळा, केळीगव्हाण, निकळक, भराडखेडा, उज्जैनपुरी, वाल्हा कंडारी बु, नजीक पांगरी, गेवराई बाजार, हिवराराळा, गोकुळवाडी, थोपटेश्वर, अकोला, अन्वी, देवगाव, बावणे पांगरी, आसरखेडा या गावांची नावे आहेत. या गावांतील तलाठ्यांना नोटीस पाठविण्यात आली आहे.

२३ रोजी करावा लागणार खुलासा

२३ जून रोजी सकाळी १० वाजता तहसील कार्यालयात हजर राहून खुलासा सादर करावा, अशी सूचना बदनापूरच्या तहसीलदारांनी कर्मचाऱ्यांना दिली आहे.

हेही वाचा : शेतकऱ्यांना लुटतोय शेतकऱ्यांचाच लेक? व्यवस्थेच्या पुढे हतबल शेतीमातीतील व्यथा 

टॅग्स :शेती क्षेत्रपाऊसपीकमराठवाडासरकारशेतकरीशेती