Pune : महाराष्ट्र राज्यातील फळ उत्पादक शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार असून केंद्र सरकारने फळ पीक विमा योजनेसाठी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. आज (८ डिसेंबर) यासंदर्भातील परिपत्रक केंद्राने जारी केले. कोकण विभागातील आंबा, काजू आणि उर्वरित महाराष्ट्रातील संत्रा पिकासाठी फळपीक विमा योजनेत भाग घेण्याचा अंतिम दिनांक ३० नोव्हेंबर २०२५ असा होता. विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी मुदतवाढ दिल्याने शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
दरम्यान, कोकण व्यतिरिक्त उर्वरित महाराष्ट्रातील आंबा पिकासाठी भाग घेण्याचा अंतिम दिनांक ३१ डिसेंबर २०२५ असा आहे. पण कोकणातील शेतकऱ्यांना एक महिना आधीच फळपीक विमा भरावा लागत होता. पण कोकणातील शेतकऱ्यांना फळपीक विमा योजनेत भाग घेण्यासाठी केंद्र शासनाने दिनांक १५ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदत वाढ दिली आहे. ही मुदतावाढ भारतीय कृषी विमा कंपनीकडे असलेल्या जिल्ह्या व्यतिरिक्त इतर जिल्ह्यांसाठी लागू राहणार आहे.
भारतीय कृषी विमा कंपनीकडे असलेल्या जळगाव, नांदेड, हिंगोली, यवतमाळ ,सिंधुदुर्ग, कोल्हापूर, वर्धा व रत्नागिरी या जिल्ह्यात भारतीय कृषी विमा कंपनीने मुदतवाढ देण्यास नकार दिल्याने तेथे ही मुदतवाढ लागू राहणार नाही. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे फळपीक विमा अर्ज करणे बाकी असेल अशा शेतकऱ्यांना लवकरात लवकर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
विमा अर्ज करण्यासाठी आता सरकारने अॅग्रिस्टॅक अंतर्गत शेतकरी नोंदणी बंधनकारक केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना आता फार्मर आयडी असल्याशिवाय मुदतवाढ मिळणार नाही. पीक विमा अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने www.pmfby.gov.in या संकेतस्थळावर करता येणार आहेत.
