Crop Insurance Advance : मागील तीन ते चार महिन्यांपासून पीकविमा अग्रीम (Crop Insurance Advance) मिळण्याची प्रतीक्षा करीत असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम आजपासून पडणार आहे. शेतकऱ्यांना ३३५.९० कोटी रुपयांची अग्रीम (Advance) मंजूर झालेली आहे.
अखेर शासनाने हप्ता मंजूर केल्याने ती अदा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. परभणी जिल्ह्यात ७ लाख ६३ हजार शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, खरीप ज्वारी, बाजरी या पिकांसाठी ५ लाख २४ हजार २६७ हेक्टरचा विमा उतरविला होता, सोयाबीन, कापूस व तूर या पिकांसाठी विमा (Crop Insurance) मंजूर झाला होता.
यात ७ लाख १४ हजार १६१ शेतकऱ्यांनी या पिकांसाठी नोंद केली आहे. यामध्ये सोयाबीन ३ लाख ८५ हजार हेक्टर, कापूस, ८९ हजार हेक्टर तर तूर ३५ हजार ५४७ हेक्टर असा पीकविमा (Crop Insurance) भरलेले क्षेत्र आहे.
परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान झाल्यानंतर अग्रीम जाहीर करण्यासाठी रेटा लावण्यात आला होता. यामुळे तो मंजूरही झाला. मात्र मागील तीन ते चार महिन्यांपासून तो अदा केला जात नसल्याने शेतकरी हैराण होता.
अनेक पक्ष, संघटनांनी यासाठी निवेदनेही दिली होती. आंदोलनेही करण्यात आली होती. त्यामुळे आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रशासनाकडून हे पैसे जमा होण्याची प्रतीक्षा संपली आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे.
लोकप्रतिनिधींनीही उचलला मुद्दा
पीकविमा मिळत नसल्याने आ. राजेश विटेकर, आ. राहुल पाटील यांनी विधिमंडळात आवाज उठविला होता. त्यानंतर कृषिमंत्र्यांनी ३१ मार्चपूर्वी पीकविमा कंपनीच्या खात्यात प्रिमियम रक्कम जमा करण्याचे आश्वासन दिले होते. हे प्रिमियम जमा नसल्याने शेतकऱ्यांना विमा दिला जात नव्हता. तो अदा करण्याचा आदेश मिळाला तर कंपनीच्या खात्यात रक्कम येत नव्हती. आता ती आली आहे. त्यानंतर कंपनीने लागलीच ती शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे सांगण्यात आले.
कंपनीचे संकेत, कृषी विभाग अनभिज्ञ
पीकविम्याबाबत कायम औदासीन्य बाळगणाऱ्या कृषी विभागाला अजूनही याबाबत काहीच माहिती नसल्याचे दिसते. प्रभारी कृषी अधीक्षक अधिकारी दौलत चव्हाण यांनी यावर बोलण्यास नकार दिला. मात्र विमा कंपनीच्या जिल्हा समन्वयकांनी कंपनीचे प्रिमियम मिळाल्याने आजपासून शेतकऱ्यांना वितरण होणार असल्याचे सांगितले.
९ एप्रिलपासून खात्यात रक्कम पडणार
ज्या शेतकऱ्यांना अग्रीम मंजूर झाली, त्यांच्या खात्यावर ९ एप्रिलपासून रक्कम जमा होणार आहे. सोयाबीन उत्पादकांना २६८.५९ कोटी रुपये, कापूस ५३ कोटी तर तुरीसाठी १४.१४ कोटी रुपये मंजूर झाले आहेत.
असा मिळणार तालुकानिहाय विमा
तालुका | रक्कम |
गंगाखेड | ३७.०१ |
जिंतूर | ५४.५१ |
मानवत | २६.६७ |
पालम | २९.९२ |
परभणी | ५८.६९ |
पाथरी | २९.३० |
पूर्णा | ३४.०० |
सेलू | ३५.२५ |
सोनपेठ | ३०.५६ |