Cotton Cultivation : मागील खरीप हंगामात कपाशीची लागवड (Cotton Cultivation) मोठ्या प्रमाणात झाली. परंतू पावसामुळे कापासाच्या वाती झाल्यामुळे उत्पादनात घट झाली. शेतकऱ्यांनी फरदडचा कापूस शेतात ठेवला आहे.
मागील वर्षी मंठा तालुक्यात खरीप हंगामात २४,६१४ हेक्टरवर कपाशीची लागवड (Cotton Cultivation) करण्यात आली होती. मात्र, कृषी विभागाकडून वेळेवर मार्गदर्शन मिळत नसल्याने फरदड कापूस घेण्याच्या मानसिकतेत असलेल्या शेतकऱ्यांचा कापूस आजही बहुतांश ठिकाणी शेतात उभाच असल्याचे दिसून येत आहे.
एकीकडे कृषी विभागाकडूनच वारंवार कपाशी पिकाविषयी फरदड घेऊ नका, असे आवाहन केले जात आहे; परंतु निसर्गामुळे कापसाचा दोन वेचणींतच झाडा होत असल्याने उत्पादन कमी होत आहे.
दोन वेचर्णीत हाती आलेल्या कापसावर खर्च फिटत नाही. त्यामुळे शेतकरी रब्बी हंगामात कापसाला पुन्हा खतपाणी देऊन फरडद कापसाचे उत्पादन घेतात.
शेतकऱ्यांच्या दृष्टीने कापसाचे पीक हे पांढरे सोने समजले जाते.
सोयाबीनला मागील दोन वर्षांपासून बाजारात भाव मिळत नाही. त्यामुळे मागील वर्षी ३२,०७५ हेक्टरवर सोयाबीन, तर कापसाचा २४,६१४ हेक्टरवर पेरा केला. काही वर्षांपासून फरदड घेण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे आजही शेतात कापूस दिसतो.
२४,६१४ हेक्टरवर कपाशीची लागवड करण्यात आली होती. मात्र, कृषी विभागाकडून वेळेवर मार्गदर्शन मिळत नसल्याने शेतकऱ्यांकडून फरदड कापूस घेतला जात आहे.
फरदड कापूस घेतल्याने पिकांवर किडींचा प्रादुर्भाव
फरदड कापूस घेतल्याने पुढील पिकावर मोठा परिणाम होतो. ज्या जमिनीत फरदड कापूस घेतला त्या शेतजमिनीत पुढील वर्षी पिकांवर किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आढळून येतो. पर्यायाने शेतकऱ्यांचा कीटकनाशकांच्या खर्चात वाढ होते. त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले जाते.
बीटी कॉटन बियाणे उपलब्ध झाले तेव्हा सुरुवातीला या कापसावर किडींचा प्रादुर्भाव कमी होता. त्यामुळे उत्पादनही भरपूर प्रमाणात होत होते. मात्र, मागील आठ-दहा वर्षापासून कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे.
कापूस पिकाच्या पऱ्हाट्या काढून त्याची योग्य विल्हेवाट लावावी जेणेकरून गुलाबी बोंड अळीच्या जीवनक्रमात घट पडेल, असा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.
सोयाबीन, कापूस हीच पिके शेतकऱ्यांसाठी आर्थिक स्रोत
* तालुक्यातील बहुतांश भागातील शेती जिरायती असल्याने सोयाबीन आणि कापूस हीच पिके शेतकऱ्यांसाठी आर्थिक स्रोत मानली जातात; परंतु या दोन्ही पिकांच्या उत्पन्नात कमालीची घट झाली आणि त्यात बाजारात कापूस व सोयाबीनच्या घसरलेल्या भावामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
* मुलांचे शिक्षण, मुलींचे लग्न, घरखर्च, शेतीखर्च, आरोग्य, बँकेचे कर्ज, खासगी दुकानदारांच्या उधाऱ्या व इतर महत्त्वाची कामे कापूस व सोयाबीन पिकांवर अवलंबून असतात.
* यंदाच्या हंगामात कापसाला चांगला दर मिळेल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र, अद्यापही कापसाला योग्य भाव मिळाला नसल्याने कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. यामुळे फरदड घेणे शेतकऱ्यांनी पसंद केले आहे.
कमी-अधिक पडणाऱ्या पावसामुळे कापसाचे उत्पादन घटते. त्यामुळे लागवडीचा खर्चही फिटत नाही व किमान खर्च निघावा, या उद्देशाने शेतकरी फरदड कापूस सांभाळतात. शेतीत आजही कापूस उभा असून, त्याला वेचण्यासाठी मजूर मिळत नसल्याने झाडाला फरदड कापूस लटकलेला दिसत आहे. - विजय बोराडे, शेतकरी, मंठा.
महागड्या फवारण्या घेऊनही किडींवर नियंत्रण करता येत नाही. शिवाय, पर्यावरणाचा समतोल बिघडतो, असे कापूस शास्त्रज्ञांकडून सांगितले जाते. मात्र, कृषी विभागाकडून यासंदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे. कारण, मार्च महिना सुरू झाला तरीही शेतकऱ्यांचा कापूस शेतात उभा आहे. - नीळकंठ वायाळ, तालुकाध्यक्ष, काँग्रेस कमिटी, मंठा.
हे ही वाचा सविस्तर : Sericulture Farming : रेशीम शेती : आर्थिक उन्नतीचा शाश्वत मार्ग वाचा सविस्तर